ऑनलाईन टीम/ तरुण भारत
कर्नाटमध्ये हिजाबवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. हिजाब घातलेल्या मुलींना महाविद्यालयात प्रवेश नाकारला जात आहे. तसेच त्यांनी हिजाब घातला तर आम्ही भगवे शेले घेऊ, अशी भूमिका हिंदूत्ववादी विद्यार्थ्यांनी घेतली आहे. राज्य सरकारने शाळा, कॉलेज तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्ष भाजपवर टीका करत आहेत. त्यावरून आता काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रियंका गांधी यांनी रोखठोक आणि थेट प्रतिक्रिया दिली आहे.
“बिकिनी असो, घुंगट असो, जीन्स किंवा हिजाब असो, आपण काय घालायचे हे ठरवण्याचा अधिकार महिलांचा आहे. हा अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे. महिलांचा छळ करणे थांबवा,” असं प्रियंका गांधी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.
कर्नाटकमधील उडपीमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून हिजाबवरून वातावरण तापलं आहे. विद्यार्थ्यांनी एकाच गणवेशात शाळा-महाविद्यालयात यावं, असा निर्णय येथील सरकारने घेतला आहे. त्यामुळे हिजाब घातलेल्या विद्यार्थिंनींना प्रवेश नाकारला जात आहे. खुद्द प्राचार्य महाविद्यालयाच्या गेटवरून मुलींना घरचा रस्ता दाखवत आहेत. मंगळवारी कर्नाटकातील पीईएस महाविद्यालयातील एक व्हिडिओ समोर आला होता. यामध्ये एक मुस्लीम विद्यार्थिनी येताच काही भगवे शेले घातलेल्या विद्यार्थ्यांनी तिला घेराव घातला आणि ”जय श्री राम” अशी घोषणाबाजी केली. त्यानंतर मुलीनं ”अल्लाह हू अकबर” म्हणत या मुलांना उत्तर दिले. तरीही हिंदूत्ववादी विद्यार्थ्यांनी हुल्लडबाजी केली. त्यानंतर हे प्रकरण चांगलंच चिघळलं आहे. सध्या या प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.