घोषणा 2-3 दिवसात शक्य : आयोगाच्या आढावा बैठका पूर्ण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाने कोरोना-ओमिक्रॉन संसर्गासह विविध पैलूंचा अभ्यास करून नियोजन पूर्ण केले आहे. त्यानुसार पुढील दोन-तीन दिवसांमध्ये निवडणूक आयोग निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याची शक्मयता आहे. निवडणूक आयोगाने नुकताच चार राज्यांचा दौरा केला होता. तसेच मणिपूरमधील स्थितीचा व्हर्च्युअल बैठकीच्या माध्यमातून आढावा घेण्यात आला. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्र सरकारसोबत कोरोना स्थितीबाबत देखील चर्चा केली आहे. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाशी चर्चा केल्यानंतर आयसीएमआर आणि एम्स या संस्थांकडूनही सूचना मागवल्या आहेत. त्यांचा अहवाल आल्यानंतर निश्चित केलेल्या तारखांवर शिक्कामोर्तब करून निवडणूक कार्यक्रमाचे बिगूल वाजणार आहे. देशात कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे हय़ावेळी निवडणूक कार्यक्रम जाहीर करताना राजकीय पक्ष आणि मतदार यांच्यासाठी कडक नियमावली जारी होण्याचे संकेत मिळत आहेत.
देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यातच ओमिक्रॉनच्या संकटाचे ढगही घोंगावत आहे. ही परिस्थिती येत्या काही दिवसांमध्ये नियंत्रणात आली नाही तर पाच राज्यांच्या निवडणुकीची तयारी कशी करायची, त्याचे नियोजन कसे करायचे असा प्रश्न केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय निवडणूक आयोगाकडून बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. तेथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुका होणाऱया राज्यांमध्ये मतदार याद्या देखील प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे सर्वजण निवडणुकीच्या तारखांची प्रतीक्षा करत आहेत.