गुलालाची उधळण : दोन्ही ग्रा. पं. कार्यक्षेत्रातील गावांमध्ये रात्री उशिरापर्यंत मिरवणूक
बिजगर्णी, बेळवट्टी ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत ग्राम विकास आघाडीने बाजी मारली आहे. बिजगर्णी-बेळवट्टी ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत पश्चिम भागासह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. पहिल्यांदाच दोन्ही ग्रा. पं. ची निवडणूक अत्यंत अटीतटीची व चुरशीने झाली. या निवडणुकीत काही नवख्या चेहऱयांना संधी मिळाली आहे. तर बिजगर्णी ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत तरुणांनी विजय मिळविला आहे.
वार्ताहर / किणये
गुरुवार दि. 30 रोजी बेळगाव येथील तहसीलदार कार्यालयामध्ये मतमोजणी झाली. सकाळी ठीक 8 वाजल्यापासून मतमोजणीच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला. दोन्ही ग्रा. पं. ची व तालुक्यातील काही रिक्त असलेल्या जागांसाठी पोटनिवडणूक झाली. मतदान मतपत्रिकेद्वारे (बॅलेट) करण्यात आले होते. आपल्या उमेदवाराचे भवितव्य गुरुवारी कळणार असल्याने उमेदवारांच्या समर्थकांनी व त्यांच्या प्रमुख पंचमंडळींनी तहसीलदार कार्यालयासमोर गर्दी केली होती.
ग्राम पंचायत निवडणुकीचा निकाल असल्यामुळे बेळवट्टी व बिजगर्णी भागातील उमेदवार, पंचमंडळी व त्यांचे समर्थक टेम्पो व इतर वाहने करून एकत्रितपणे सकाळी 7 वाजल्यापासूनच तहसीलदार कार्यालयासमोर येत असतानाचे चित्र पहावयास मिळाले. काही उमेदवारांना आपणच विजयी होणार याची खात्री असल्याने सकाळपासूनच विजयोत्सवाची तयारी केली होती.
बेळवट्टी-बिजगर्णी ग्रा. पं. कार्यक्षेत्रातील गावांमध्ये आपल्या गावातील विजयी झालेल्या नवनिर्वाचित सदस्यांना खांद्यावर घेऊन कार्यकर्ते जल्लोष साजरा करीत होते. एकमेकांवर गुलालाची उधळण करून आनंदोत्सव केला. विजयी झालेल्या नवनिर्वाचित सदस्यांची गावांमध्ये रात्री उशिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, तसेच ढोल ताशांचा गजरही झाला. यामुळे विजयी नूतन सदस्यांपेक्षा त्यांच्या समर्थकांमध्येच अधिक आनंद झाला असल्याची दिसून येत होते.
बिजगर्णीत ग्रामस्थ महाविकास आघाडीची बाजी
बिजगर्णी ग्रा. पं. च्या कार्यक्षेत्रामध्ये बिजगर्णी, कावळेवाडी, राकसकोप, यळेबैल या गावांचा समावेश असून एकूण 14 जागा आहेत. बिजगर्णी गावातील वॉर्ड क्र. 1 मधील 3 जागांसाठी 9 उमेदवारांमध्ये लढत झाली तर वॉर्ड क्र. 2 मधील चार जागांसाठी 8 उमेदवारांमध्ये चुरशीने निवडणूक झाली. बिजगर्णी गावात प्रारंभी बिनविरोध निवडणूक करण्यासाठी गावातील काही पंचमंडळींनी प्रयत्न केले होते. अलीकडे ग्रा. पं. च्या निवडणुकीसाठी गावागावांमध्ये इच्छुकांची संख्या वाढू लागल्याने बिजगर्णी गावातही निवडणूक झाली. दि. 20 रोजी अर्जमाघारीची प्रक्रिया झाल्यानंतर निवडणूक चिन्हांचे वाटप झाल्यानंतर गावात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. दि. 27 रोजी या दोन्ही ग्राम पंचायतींचे मतदान झाले. यामध्ये बिजगर्णी ग्रा. पं. चे 92 टक्के तर बेळवट्टी ग्रा. पं. साठी 81 टक्के मतदान झाले होते.
आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी समर्थकांनी व त्यांच्या नेतेमंडळींनी शर्थीचे प्रयत्न केले होते. बिजगर्णी वॉर्ड क्र. 1 मधील सामान्य या जागेसाठी पाच उमेदवार रिंगणात होते.
यामध्ये संदीप काशिनाथ अष्टेकर हे 557 मते मिळवून विजयी झाले. तर धोंडिबा यल्लाप्पा गुरव यांना 414 मते, रवळू शिवाजी तारिहाळकर 124 मते मोनाप्पा यल्लाप्पा भाष्कळ 89 मते, शिवाजी मारुती पाटील 31 मते मिळाली. संदीप अष्टेकर व धेंडिबा गुरव यांच्यामध्ये चढाओढ झाली होती. मात्र अखेर संदीप अष्टेकर यांनी विजयी मिळविला. वॉर्ड क्र. 1 मधील मागासवर्गीय अ या जागेसाठी मेहबूब अब्दुल नावगेकर व लहरु अब्दुलसाब अनगोळकर यांच्यात लढत झाली. यामध्ये मेहबूब नावगेकर यांनी 453 मते घेत विजय प्राप्त केला. तर लहरु अनगोळकर यांना 328 मते मिळाली. वॉर्ड क्र. 1 मधीलच अनुसुचित जमाती महिला या जागेसाठी झालेल्या निवडणुकीत रेखा सागर नाईक यांनी 358 मते मिळवून विजय मिळविला. त्यांच्या प्रतिस्पर्धा संगीता शंकर नाईक यांना 283 मते मिळाली.
बिजगर्णी येथील वॉर्ड क्र. 2 मध्ये 4 जागांसाठी आठ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये सामान्य या जागेसाठी मनोहर पिराजी बेळगावकर व विरुद्ध अमोल विलास जाधव यांच्यात चुरशीने मतदान झाले होते. बिजगर्णी गावात बेळगावकर हे मोठे कुटुंब असून मनोहर बेळगावकर यांनी ग्रामस्थ महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविली. मनोहर व अमोल या दोन तरुण उमेदवारांमध्ये मतमोजणीच्या वेळीही चांगलीच चढाओढ निर्माण झाली होती. तर बाहेर असलेल्या दोन्ही उमेदवारांच्या सपर्थकांचे लक्ष या निकालाकडे लगून राहिले होते. अखेर यामध्ये मनोहर पिराजी बेळगावकर यांनी 598 मते घेऊन विजय मिळविला. तर अमोल विलास जाधय यांना 463 इतकी मते मिळाली. 135 इतकी अधिक मते मनोहर यांना मिळाली. या तुलनेत अमोल जाधव यांनीही बेळगावकर यांना चांगलीच टक्कर दिली असल्याची चर्चा गावात रंगली होती.
वॉर्ड क्र. 2 मध्ये सामान्य महिला या जागेकरिता झालेल्या निवडणुकीत चंदभागा दामू जाधव यांनी 458 मते मिळवून विजय प्राप्त केला. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी यल्लुबाई ताराचंद्र जाधव यांना 334 मते मिळाली. सामान्य महिला या जागेसाठी झालेल्या निवडणुकीत शीतल भावकू तारिहाळकर यांनी 454 मते मिळवत विजय प्राप्त केला तर शोभा गुंडू भाष्कळ यांना 306 मते मिळाली. अनुसूचित जाती या जागेसाठी झालेल्या निवडणुकीत 475 मते घेऊन संतू इराप्पा कांबळे यांनी बाजी मारली. त्यांचे प्रतिस्पर्धी मारुती हुवाप्पा कांबळे यांना 403 मते मिळाली.
कावळेवाडी गावातील दोन जागांसाठी सहा उमेदवारांमध्ये निवडणूक झाली. यामध्ये सामान्य जागेसाठी चार तगडे उमेदवार रिंगणात होते. यामध्ये ऍड. नामदेव मोरे व अरुण कणबरकर या दोघांमध्ये रंगतदार लढत झाली. ऍड. नामदेव मोरे यांनी 320 मते मिळवून विजय प्राप्त केला तर अरुण मल्लाप्पा कणबरकर 268 मते, यल्लाप्पा नागू बुरुड 23 मते, मनोहर विष्णू जाधव 10 मते मिळाली. कावळेवाडी गावातील मागासवर्गीय अ महिला या जागेसाठी झालेल्या निवडणुकीत मनीषा दीपक सुतार यांनी 290 मते मिळवून बाजी मारली. तर चांदबी शहानूर अनगोळकर यांना 236 मते मिळाली.
राकसकोप येथे सामान्य महिला या जागेसाठी झालेल्या निवडणुकीत लक्ष्मी लक्ष्मण पाटील यांनी 524 मते मिळवून विजय मिळविला. तर संध्या सोमनाथ सुकये यांना 327 मते मिळाली. इतर मागासवर्गीय ब या जागेसाठी झालेल्या निवडणुकीत पूजा मोनेश्री सुतार 422 मते घेत विजयी झाल्या. शिवाजी अप्पाजी कंग्राळकर यांना 343 मते मिळाली. अनुसूचित जाती महिला या जागेसाठी मंजुळा लक्ष्मण कांबळे यांनी 392 मते घेत विजयश्री प्राप्त केली. तर रेखा भरमू कांबळे यांना 364 मते मिळाली.
यळेबैल येथील दोन जागांपैकी गायत्री प्रभाकर सुतार यांची बिनविरोध निवड झाली. तर सामान्य या जागेसाठी तीन उमेदवार रिंगणात होते. या गावातील निवडणूक अटीतटीची झाली. यामध्ये महेश दुर्गु पाटील यांनी 324 मते मिळवून विजय मिळविला. त्यांचे प्रतिस्पर्धी दत्तोपंत मारुती कांबळे 178 मते, जोतिबा नारायण पाटील 65 मते मिळाली.
बेळवट्टी ग्राम पंचायत निकाल
बेळवट्टी ग्राम पंचायतीची निवडणूक अतिशय चुरशीची झाली. मागील दोन वेळच्या निवडणुकीमध्ये या ग्रा. पं. ची निवडणूक बिनविरोध झाली होती. यंदाही बिनविरोध निवडणूक करण्यासाठी प्रयत्न सुरू होता. मात्र त्याला यश आले नाही. या ग्रा. पं. मध्ये बेळवट्टी, बोकनूर, इनाम बडस व धामणे एस. या गावांचा समावेश असून एकूण 11 सदस्य आहेत. यापैकी सहा जणांची बिनविरोध निवड झाली. तर उर्वरित पाच जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात होते.
बेळवट्टी गावात एकूण चार जागा आहेत. यामध्ये मधुकर नागो नलवडे, निशा इराप्पा चांदीलकर, महादेवी परशराम मेदर या तिघांची बिनविरोध निवड झाली तर सामान्य या एका जागेसाठी बाबुराव निंगाप्पा पाटील व नारायण जोतिब नलवडे यांच्यात निवडणूक झाली. यामध्ये ग्राम विकास आघाडीचे बाबुराव निंगाप्पा पाटील यांनी 670 मते मिळवून विजय मिळविला. बेळवट्टी गावातील विजयी उमेदवारांनी तरुण भारत कार्यालयास सदिच्छा भेट देऊन तरुण भारतचे संस्थापक बाबुराव ठाकुर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नूतन ग्रा. पं. सदस्यांसह नामदेव गाडेकर, रामलिंग देसाई, एन. के. नलवडे, गावडू हाजगोळकर, मारुती कांबळे, गोविंद चौगुले, दत्तू होसूरकर, नामदेव शिवणगेकर, मोहन कांबळे, गुंडू बडसकर, सातेरी पाटील, रवळू पाटील, लुमाण्णा नलावडे आदी उपस्थित होते.
बाकनूर गावात चुरशीने मतदान झाले. सामान्य जागेसाठी झालेल्या निवडणुकीत म्हाळू नारायण मजुकर यांनी 276 मते मिळवून विजय मिळविला. भरमू लक्ष्मण गावडे यांना 241 मते मिळाली. सामान्य महिला जागेसाठी रेखा निंगू कुलम यांनी 315 मते मिळवून बाजी मारली. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी आनंदी गोडसे यांना 197 मते मिळाली. तर रेणुका प्रकाश सुतार यांची बिनविरोध निवड झाली होती.
इनाम बडस येथे अनुसूचित जाती महिला या जागेसाठी झालेल्या निवडणुकीत अनुराधा कृष्णा कांबळे यांनी 356 मते मिळवून विजय मिळविला तर पूनम कृष्णा कांबळे यांना 138 मते मिळाली. सामान्य या जागेसाठी विठ्ठल रामलिंग पाटील यांनी 299 मते मिळवून बाजी मारली तर गितेश मल्लाप्पा ठाणब यांना 201 मते मिळाली. रुपा रवळनाथ सुतार यांची बिनविरोध निवड झाली.
तसेच धामणे एस. या गावात एक जागा होती. गावातील पंचमंडळी व नेतेमंडळी यांनी विशेष प्रयत्न करून गावच्या एकीसाठी गावची निवडणूक बिनविरोध केली. यामध्ये धाकलू कृष्णा पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली.
बाकनूर व इनाम बडस गावातील नवनिर्वाचित सदस्यांनी तरुण भारत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी रवळू आप्पाजी गोडसे, विठ्ठल मजुकर, जोतिबा पाटील, गणपती बुधाजी पाटील, रुद्राप्पा काळू नाईक, सुरेश नाईक, नाना मजुकर, विठ्ठल गोडसे, कल्लाप्पा पाटील, प्रकाश सुतार, नारायण पाटील, नारायण कांबळे आदी उपस्थित होते.
बिजगर्णी ग्रा. पं. च्या नवनिर्वाचित सदस्यांनीही तरुण भारत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी नूतन सदस्यांसमवेत निंगाप्पा जाधव, यल्लाप्पा बेळगावकर, मारुती जाधव, वसंत अष्टेकर, परशराम भाष्कळ, जोतिबा मोरे, नारायण भाष्कळ आदींसह ग्रामस्थ महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते. यळेबैल गावच्या नवनिर्वाचित सदस्यांनी तरुण भारत कार्यालयाला भेट दिली. याप्रसंगी नूतन सदस्यांसमवेत गुंडू रुक्माण्णा पाटील, शिवाजी केसरकर आदींसह गावातील प्रमुख मंडळी उपस्थित होती.
बिजगर्णी ग्रा. पं. मध्ये एकूण 4147 इतके मतदान होते. यापैकी 3801 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तर यामध्ये 71 मते बाद झाली. बेळवट्टी ग्रा. पं. मध्ये एकूण 2775 इतकी मते असून 2242 मतदान झाले होते. यामध्ये 51 मते बाद झाली.