सुमारे दोन एकरातील ऊस जळाल्याने शेतकऱयांचे आर्थिक नुकसान : नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची मागणी
वार्ताहर /किणये
बिजगर्णी येथील गावडू नारायण हलकर्णीकर व रामलिंग गावडू हलकर्णीकर यांच्या ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. या आगीत सोलारही खराब झाले आहेत. सोमवारी दुपारी 12 च्या दरम्यान आग लागली असल्याची माहिती स्थानिक शेतकऱयांनी दिली.
आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण समजू शकले नाही. मात्र भर दुपारी आणि कडक उन्हात आग लागल्याने गावातील नागरिक भयभीत झाले होते. ऊस पिकाला आग लागल्याने साऱयांचीच तारांबळ उडाली होती.
नावगे डोंगराजवळ गावडू हलकर्णीकर व रामलिंग हलकर्णीकर यांची शेती आहे. या शिवारात त्यांनी ऊसाचे पीक घेतलेले आहे. वर्षभर काबाडकष्ट करून उसाचे पीक तोडणीला आले होते. येत्या आठवडय़ात या उसाची तोडणी करण्याची हलकर्णीकर शेतकऱयांनी ठरविले होते. मात्र ऐन हातातेंडाला आलेले पीकच आगीत जळून खाक झाल्यामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.
आग लागल्यानंतर आजुबाजुच्या शेतकऱयांनी ताबडतोब याची माहिती गावातील नागरिकांना दिली. यानंतर गावातील नागरिक त्या शिवारात धावून गेले आणि झाडांच्या डहाळी तोडून त्याच्या सहाय्याने आग विझविण्यासाठी धडपड करू लागले. काहींनी माती टाकून व मिळेल त्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. मात्र शिवारातील सुमारे दोन एकरातील ऊस पीक आगीत जळाला. तर उर्वरीत ऊस पीक नागरिकांनी धडपड करून वाचविले.
यात्रेला गेल्यानंतर आगीची दुर्घटना
रामलिंग हलकर्णी हे काही कामानिमित्त पुण्याला गेले होते. तर त्यांचे वडील गावडु हलकर्णीकर हे खानापूर येथील एका यात्रेला गेले होते. आणि अशातच उसाला आग लागल्याने त्यांच्यावर मोठे संकट निर्माण झाले आहे.
हलकर्णीकर हे सोलार सिस्टमच्या आधारेच ऊस पीक घेतात. या आगीत सोलारही खराब झाले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे अधिकारी व अग्निशमन वाहन दाखल झाले होते. त्या ठिकाणी पंचनामा करण्यात आला. सदर हलकर्णीकर यांना प्रशासनाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी स्थानिक शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.