प्रतिनिधी/ बेंगळूर
अन्नभाग्य योजनेतील तांदळाची परराज्यात बेकायदेशीरपणे वाहतूक करणारे 4 ट्रक अडवून 120 टन तांदूळ बिदर जिल्हय़ाच्या बसवकल्याण तालुक्यातील सस्तापूर येथे जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी 8 जणांना अटक करण्यात आली आहे. सदर तांदूळसाठा गुरुमित्कलहून गुजरातकडे वाहतूक करण्यात येत होता.
हैदराबाद-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वरून गुजरातला अन्नभाग्य योजनेतील तांदळाची बेकायदेशीरपणे वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती मिळताच अन्न निरीक्षक राजेंद्रकुमार आणि रामरतन देगले यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांच्या पथकाने कारवाई केली. याप्रकरणी राजस्थान येथील ट्रकचालक बागीखान (वय 25), अरब खान (वय 29), बरकत अली (वय 25), शफिखान (वय 25), क्लिनर अब्बाश (वय 24), जोशीबखान (वय 29), कासिम खान (वय 30) यांना अटक करण्यात आली आहे.
एकेका ट्रकमध्ये 9 लाख रुपये किमतीचे 300 क्विंटल तांदळाच्या पोती आढळून आल्या आहेत. एकूण 30 लाख रुपयांचा तांदूळ आणि चार ट्रकजप्त करण्यात आले आहेत. आहे. घटनास्थळी तहसिलदार सावित्री सलगर, पोलीस निरीक्षक गुरु पाटील यांनी भेट देऊन घटनेसंबंधीची माहिती घेतली. यादगिर शहर पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.