वार्ताहर / कास :
सातारा तालुक्यातील नावली (गिरीकेळ) येथे आज सकाळी झालेल्या बिबटय़ाच्या हल्ल्यात पांडुरंग शिंदे यांची कालवड ठार झाली आहे.
मिळालेल्या माहीतीनुसार, बुधवार आज सकाळी पांडुरंग शिंदे यांची गुरे चरावयास घरा शेजारील शिवारात गेली असता अचानक बिबटय़ाने तीन वर्षाच्या कालवडीवर हल्ला केला, यात कालवड जखमी झाली. अराडाओरडा केल्याने तिची बिबटय़ापासुन गुराख्यांनी सुटका केली. मात्र, काही वेळातच तिचा मृत्यू झाला.
डोंगरकपारीत वास्तव्य करणाऱ्या शेतकऱ्यांची शेती आणि पशुधन यावरच उपजिवीका अवलंबून असून त्यावर वन्यप्राण्यांचा घाला सुरु असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. रानगवे, वानर, माकड, डुक्कर, साळींदर, मोर आदी प्राणी शेती फस्त करत असून, बिबटे जनावरे फस्त करत आहेत. गवे, अस्वलांचे माणसांवर हल्ले वाढले असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. मात्र वनविभागाच्या उपाययोजना नियोजन शुन्य असल्याने वन्यप्राणी वस्तीत घुसू लागले असून, शेतकऱयांना मदतीपासूनही वंचीत राहावे लागत आहे.
चार एकर गहू रानगव्यांनी केला फस्त
याच गावातील पांडुरंग शिंदे व विठ्ठल शिंदे यांच्या शेतीतील 4 एकर गहु रानगवांनी फस्त केला आहे. वनविभागाचे सातारा वनक्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन कुटुंबीयांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.