पावसजवळील मेर्वी येथील घटना
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी तालुक्यातील पावसजवळील मेर्वी येथे बिबटय़ाने एका शेतकऱयावर हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी सकाळी 6.30 च्या झालेल्या या हल्ल्यात जनार्दन काशिनाथ चंदूरकर (55, रा. मेर्वी जांभूळआडी) गंभीर जखमी असून त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. गणेशगुळे-मेर्वी परिसरात यापुर्वीही बिबटय़ाने मानवावर हल्ला करण्याच्या अनेक घटना घडल्या असून त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
जनार्धन चंदूरकर सकाळी गावाजवळील जंगलात जांभुळभाटले येथे गुरे चरण्यासाठी गेले होते. गुरे सोडून ते घरी परतत होते. वाडीत येण्यासाठी आंबा बागेतून असेल्या पायवाटेने ते येत बिबटय़ाची पिल्ले त्यांच्या नजरेस पडली. त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी ते पुढे सरसावले. त्याचवेळी मादी बिबटय़ाने चंदूरकर यांच्यावर हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्याने ते बिथरून गेले. काही क्षण ते निपचित पडून राहिले. चंदूरकर कोणतीही हालचाल करत नसल्याचे पाहून त्यामुळे बिबटय़ा पिल्लांच्या दिशेने गेला.
बिबटय़ान तेथून बाजूला गेल्याचे पाहून जीव वाचवण्यासाठी चंदुरकर यांनी तेथून पळ काढला. बागेजवळ काही अंतरावर असलेल्या शेत घरात ते पळाले. शेत घराच्या टेरेसवर जाऊन त्यांनी आरडाओरडा केला. त्यांच्या आवाजाने ग्रामस्थ घटना स्थळी दाखल झाले.
हा प्रकार समजल्या नंतर मेर्वी सरपंच शशी म्हादये, ग्रामस्थ, वन विभागाचे अधिकारी प्रियांका लगाटे घटनास्थळी दाखल झाले. जखमी झालेल्या चंदूरकर यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वनविभाग करतो काय?
रत्नागिरीतील कुर्धे, मेर्वी या भागात बिबटय़ाचा मुक्त संचार कायमच असतो. यामुळे या परिसरातील ग्रामस्थ भयभीत आहेत. अशा परिस्थितीत वन विभाग काय करतोय? अशा शब्दात पावस गटातील शिवसेना विभागप्रमुख किरण तोडणकर यांनी वन विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.
गणेशगुळे परिसरात बिबटय़ाची दहशत
यापुर्वी गणेशगुळे फाटय़ावर झाडीत लपलेल्या बिबटय़ाने रात्री 9 च्या सुमारास दुचकीवरून जाणारे गणेशगुळेचे सरपंच संदिप शिंदे व विश्वास सुर्वे यांच्यावर हल्ला केला होता. त्यानंतर त्याच दिवशी काही वेळाच्या फरकाने दुचाकीवरून जाणाऱया निखिल साळवी व बळीराम जोशीलकर यांच्यावरही असाच हल्ला झाला होता. मेर्वीतील निलेश म्हादये, निलेश नाटेकर यांच्यावर बिबटय़ाने हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यामुळे गणेशगुळे मार्गावर गणेशगुळे फाटा व कुडते येथे सीसीटीव्ही व पिंजरे लावण्यात आले होते. मात्र त्यात सापडू शकला नव्हता. त्यानंतरही पुन्हा दुचकीस्वार संतोष कुडतरकर व मंगेश खेर्डे यांच्यावर गणेशगुळे परिसरात बिबटय़ाने हल्ला केला होता.