सोलये येथे बिबटय़ाची दहशत : वनखात्याला दोन दिवसांची मुदत : वनखात्याने हालचाली स्पष्ट करण्यासाठी कँमेरा ट्रप लावला
प्रतिनिधी /वाळपई
होंडा पंचायत क्षेत्रातील सोलये गावातील घरांमध्ये दोन वेळा बिबटय़ा घुसल्यामुळे भीतीचे वातावरण गावात पसरले आहे. या प्रकारामुळे संतप्त बनलेल्या नागरिकांनी वनखात्याला बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली आहे. दोन दिवसात बिबटय़ाला न पकडल्यास वनखात्यावर मोर्चा नेण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.
दरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक तांडेल यांनी यात गांभीर्याने लक्ष देऊन सोमवारी संध्याकाळी सदर भागांमध्ये फिरुन एकूण परिस्थितीचा आढावा घेतला. ठिकठिकाणी कॅमेरा ट्रप लावण्यात आला असून त्यानंतर बिबटय़ांची हालचाल पाहून पिंजरा बसविण्यात येणार असल्याची माहिती दीपक तांडेल यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली.
सोलये गावातील चिरेव्हाळ येथील गजानन मराठे यांच्या घरामध्ये दोन वेळा बिबटय़ा घुसल्याची बाब उघडकीस आलेली आहे. यामुळे गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. एक महिन्यापूर्वी सदर बिबटय़ा गावांमध्ये घुसला होता. वनखात्याने गांभिर्याने लक्ष देऊन त्याला पकडण्याची व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याचा नागरिकांचा आरोप आहे. परत 20 जून रोजी पुन्हा एकदा सदर बिबटा घराच्या बाजूने जात असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये स्पष्ट झालेले आहे. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आज स्थानिक पंचसदस्य प्रतिक्षा गावडे यांच्या नेतृत्वाखाली वाळपई वनखात्याच्या कार्यालयांमध्ये जाऊन या संदर्भात सविस्तरपणे चर्चा केली.
वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक तांडेल इतर कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांची त्याच्याशी भेट होऊ शकली नाही. मात्र पत्रकारांशी बोलताना त्यांनी दोन दिवसात सदर बिबटय़ाला पकडण्याची व्यवस्था करावी अन्यथा वाळपईच्या वनखात्याच्या कार्यालयावर संपूर्ण गावांचा मोर्चा नेण्याचा इशारा दिला. आनंद गावडे यांनी सांगितले की बिबटय़ा गावात घुसून गावांमध्ये दहशत निर्माण करीत आहे. गावातील ग्रामस्थांवर हल्ला केल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल करून त्याला पकडण्याची व्यवस्था करा अशी जोरदार मागणी केली.
वनखात्याच्या अधिकाऱयांनी भागाची पाहणी केली
वाळपई वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक तांडेल यांनी सांगितले की, सदर बिबटा गावामध्ये कुत्र्याच्या शोधासाठी येत आहे. सोलये गावात जाऊन संपूर्णपणे पाहणी केलेली आहे. ज्याठिकाणी पिंजरा बसविण्यात येणार आहे त्या ठिकाणची पाहणी करण्यात आलेली आहे. गावाच्या एका बाजूला पूर्णपणे खाणीचा परिसर आहे. मात्र सदर बिबटय़ा गावामध्ये कुठून येतो या अजूनपर्यंत अंदाज मिळालेला नाही. यामुळे सध्यातरी गावाच्या सभोवताली कॅमेरा लावण्यात आलेला आहे. दोन दिवसात सदर बिबटय़ाच्या हालचाली स्पष्ट होणार आहे. त्यानंतर त्यांच्या हालचाली ज्याठिकाणी आहेत सदर ठिकाणी पिंजरा बसविण्याची व्यवस्था करण्यात येईल असे यावेळी दीपक तांडेल यांनी स्पष्ट केले.