पाईप तोंडात धरून रात्रभर मदतीची प्रतीक्षा
पिंजरा खाली सोडताच घेतली उडी
कणकवली-कळसुलीतील घटना
कणकवली:
वेळ रविवारी सकाळी 9 ची… कळसुली मधलीवाडी येथे ग्रामस्थांच्या दैनंदिन कामाला जेमतेम सुरुवात होत होती. त्याचवेळी विहिरीमधून बिबटय़ाच्या डरकाळय़ा घुमू लागल्या अन् ग्रामस्थांची भीतीने गाळणच उडाली. काही ग्रामस्थांनी धाडस करून विहीर गाठून आत डोकावले तेव्हा आत बिबटय़ा असल्याचे दिसून आले. ही बातमी वाऱयासारखी पसरली अन् सर्वजण विहिरीकडे धाव घेऊ लागले.
विहिरीत सोडलेल्या पाण्याच्या पंपाला पंजाच्या सहाय्याने धरून असलेल्या बिबटय़ाच्या डरकाळय़ा सुरुच होत्या. दुपारी 12 च्या सुमारास वन कर्मचाऱयांनी पिंजऱयाच्या सहाय्याने बिबटय़ाला विहिरीबाहेर काढले. दहा फूट खोल पाण्यामध्ये फक्त पंपाला धरून रात्रभर लोंबकळत असलेला हा बिबटय़ा क्षणाचाही विचार न करता पिंजऱयात शिरला तेव्हा ग्रामस्थांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.
अन् डरकाळय़ा घुमल्या
कळसुली-मधलीवाडी हा काहीसा जंगलमय भाग आहे. तेथे गोपाळ दळवी यांची कठडा असलेली विहीर आहे. विहिरीवर पाण्याचा पंपही बसविलेला आहे. रविवारी सकाळच्या सुमारास तेथील श्रीकृष्ण दळवी यांना पाण्याचा पंप सुरू होत नव्हता. बहुधा पंपात काहीतरी बिघाड झाला असावा, असे दळवी यांना वाटले. त्यासाठी त्यांनी विहिरीवर जाऊन खात्री करायचा विचारही केला. त्याचवेळी विहिरीतून बिबटय़ाच्या डरकाळय़ा ऐकू आल्या.
पंपाला धरून होता बिबटय़ा
विहिरीत बिबटय़ा दिसताच दळवी यांची भीतीने गाळणच उडाली. बघता बघता बातमी गावभर पसरली आणि ग्रामस्थांची विहिरीकडे गर्दी वाढू लागली. नारायण दळवी, गोपाळ दळवी, संजय दळवी, अरुण यादव, सत्यवान दळवी आदींसह ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. पण, एकीकडे दहा फूट खोल पाणी असलेल्या विहिरीतून बाहेर पडता येत नसल्याने पंपाला पंजाच्या सहाय्याने धरून थांबलेला तो बिबटय़ा ग्रामस्थांच्या आरडाओरडीने आणखी बिथरला. परिणामी त्याच्या डरकाळय़ा घुमू लागल्या.
बिबटय़ाही हताश
श्रीकृष्ण दळवी यांनी घोटगे येथील वनकार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर वनपाल टी. बी. दळवी घटनास्थळी दाखल झाले. या सर्व प्रकारात बिबटय़ाच्या पायांनी, दातांनी पाण्याचा पंप अक्षरश: कुडतरला गेला. पण, जसजसा वेळ होत गेला तसा दमलेला, थकलेला बिबटय़ाही शांत होऊ लागला. त्याच्या डरकाळय़ांचे रुपांतर गुरगुरण्यात झाले. हळहळू तो फक्त पंपाला धरून शांत होता.
वनविभागाच्या पिंजऱयात कैद
दुपारी 12 च्या सुमारास वैभववाडी येथून वन कर्मचारी पिंजरा घेऊन घटनास्थळी आले. कर्मचाऱयांनी दोरीच्या सहाय्याने पिंजरा विहिरीत सोडला. तेव्हा हा बिबटय़ा क्षणाचाही विचार न करता पिंजऱयात शिरला. अवघ्या 15 मिनिटात वनविभागाची मोहीम फत्ते झाली अन् बिबटय़ा विहिरीमधून पिंजऱयात कैद झाला.
बिबटय़ाला जंगलात सोडणार
बिबटय़ा दोन ते अडीच वर्षांचा आहे. बिबटय़ा बहुधा कुत्र्याच्या मागे लागला असावा. कुत्र्याचा पाठलाग करताना तो विहिरीत पडला असावा, असा अंदाज वन कर्मचाऱयांनी व्यक्त केला. विहिरीबाहेर आल्यानंतर पिंजऱयात बंद झाल्यानंतर बिबटय़ाचे गुरगुरणे पुन्हा सुरू झाले होते. वनकर्मचाऱयांनी बिबटय़ाला पिंजऱयासह आपल्या वाहनात घातले. बिबटय़ाला दाजीपूर येथे जंगलात सोडण्यात येणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले
वनविभागाची टीम
या मोहिमेत सावंतवाडी उपवनसंरक्षक एस. बी. नारनवर, कणकवली वनक्षेत्रपाल आर. एस. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिगवळे वनपाल टी. बी. दळवी, कळसुली वनरक्षक एस. के. गळवे, नरडवे वनरक्षक प्रतिराज शिंदे, देवगड वनरक्षक रानबा बिक्कड, वैभववाडी वनरक्षक अमिर काकतीकर, भिरवंडे वनरक्षक अविनाश राठोड, वनमजूर मधु सावंत, खारेपाटण वनरक्षक माळी, दिगवळे वनरक्षक पल्लवी दाभाडे, वनरक्षक कुंभवडे वैशाली कुंभार, खारेपाटण वनरक्षक शेगावे आदी सहभागी झाले होते.
बिबटय़ामुळे ग्रामस्थांमध्ये घबराट
कळसुली परिसरात यापूर्वीही ग्रामस्थांना बिबटय़ाचे दर्शन घडले आहे. तर गवारेडय़ांकडून शेतीची नासधूस होण्याचे प्रकार वारंवार घडतच असतात. यावेळी तर बिबटय़ा चक्क वस्तीपर्यंत पोहोचल्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराट वाढली आहे. या वन्यप्राण्यांचा वेळीच बंदोबस्त होणे आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त होत होत्या.