प्रतिनिधी/ बेळगाव
बिम्सच्या कारभारावर पालकमंत्र्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. सोमवारी सकाळी सरकारी विश्रामधामावर झालेल्या बैठकीत त्यांनी बिम्सच्या कारभारावर नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळाली असून कारभार सुधारण्याची सूचना दिली आहे. लवकरच काही महत्त्वपूर्ण बदलाचे संकेतही पालकमंत्र्यांनी दिले आहेत.
रेल्वेराज्यमंत्री सुरेश अंगडी, पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत सोमवारी सरकारी विश्रामधामावर बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी आदींसह बिम्समधील काही अधिकारीही उपस्थित होते.
उपलब्ध माहितीनुसार पालकमंत्र्यांनी कोरोना महामारीचा सद्यस्थितीचा आढावा घेतानाच बिम्समध्ये सध्या काय परिस्थिती आहे? सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी का वाढल्या आहेत? वैद्यकीय सेवा सुरळीतपणे का मिळत नाहीत? अशी विचारणा केली आहे. बिम्स प्रशासनासंबंधी सामान्य नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे सरकारची बदनामी होते. वेळेत सुधारा, अशी सूचना पालकमंत्र्यांनी केल्याची माहिती मिळाली आहे.
बैठकीनंतर पत्रकारांनी बिम्ससंदर्भात कोणता निर्णय घेतला? अशी विचारणा केली असता सध्या परिस्थिती ठिक नाही, अशावेळी एखाद्याची बदली केल्यास त्याचा विपरित परिणाम होतो. त्यामुळेच सध्या निर्णय घेतला जात नसला तरी सर्वसामान्यांच्या तक्रारी लक्षात घेऊन बिम्स प्रशासनात योग्य बदल केला जाईल, असा सूचक इशारा पालकमंत्र्यांनी दिला आहे.
सध्या अन्य रुग्णांवर उपचार बंद करुन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये केवळ कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. मात्र तेथील व्यवस्था कोलमडली आहे. कोरोना बाधितांना व्यवस्थित जेवण मिळत नाही, पिण्याचे पाणीही मिळत नाही. याबरोबरच स्वच्छतागृहांची संख्या कमी आहे. त्यामुळेही रुग्णांची गैरसोय होत आहे. आहे ती स्वच्छतागृहे अस्वच्छ आहेत. यासंबंधी अनेक रुग्णांनी केलेले व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी बिम्समधील कारभाराचा आढावा घेतला आहे.
डॉक्टर, कर्मचारीही धास्तावले
बेळगाव शहर व उपनगरांतील सरकारी व खासगी डॉक्टरांपैकी अनेकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये काही नामवंत डॉक्टरांचाही समावेश आहे. याबरोबरच परिचारिका, वॉर्डबॉय, एक्सरे टेक्निशियन, लॅब टेक्निशियन आदींनाही कोरोनाची लागण झाली आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेली रुग्णसंख्या व मृत्यूचे प्रमाण लक्षात घेता कोरोनाबाधितांवर उपचार करण्यास कोणीही पुढे येत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आजवर काही खासगी इस्पितळात उपचार मिळत होते. हळुहळू तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलला जा असे सांगत संशयितांना परत पाठविण्याचे प्रकार घडू लागले आहेत. डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारीही धास्तावले असून त्यामुळे बेळगावात नेमकी परिस्थिती काय आहे, हे लक्षात येते. अशा परिस्थितीत स्वतःची काळजी स्वतःच घेण्याची गरज निर्माण झाली आहे. सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्याबरोबरच गरज असली तरच घराबाहेर पडण्याचा सल्ला अनेक डॉक्टरांनी दिला आहे. पुढचा पंधरवडा धोक्मयाचा असल्याचा इशाराही काही तज्ञांनी दिला आहे.