प्रतिनिधी / कोल्हापूर ( हुपरी )
पट्टणकोडोली (ता.हातकणंगले) येथील महाराष्ट्रासह अनेक राज्यांत प्रसिद्ध असणार्या जागृत देवस्थान श्री विठ्ठल बिरदेव यात्रेस मानकरी, पुजारी आणि सेवेकरी यांच्यासह150 भाविकांच्या उपस्थितीत साध्या पध्दतीने प्रारंभ झाला. धनगरी ढोल,कैताळाच्या निनादात ‘श्री विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलं’च्या गजरात फरांडेबाबांनी ऐतिहासिक ‘हेडाम’ सोहळ्याचे दर्शन घडविले. यावेळी प्रसिद्ध भाकणूकीचा धार्मिक सोहळा पार पडला.
दरम्यान,कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हि यात्रा रद्द करून केवळ धार्मिक कार्यक्रम पार पाडण्याचा निर्णय यात्रा कमिटी, ग्रामपंचायत व प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच येथील यात्रा काही मोजक्या भाविकांच्या उपस्थित विना गर्दीची पार पडली. प्रत्येक वर्षी भाविकांनी फुलून दिसणारा परिसर मोकळा मोकळा दिसत होता.
फरांडेबाबांची प्रसिद्ध भाकणूक
खेलोबा नाना उर्फ राजाभाऊ वाघमोडे (फरांडेबाबा) महाराज मंदिरात आले. त्यांनी देवाचे दर्शन घेतले. त्यांनी ‘श्री विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलं’ असा गजर करीत भाकणूक केली.
साखर , मिरची व तांबडे धान्याचा भाव वाढेल. रोहिणीचा पाऊस मृग नक्षत्रावर पेरणी होईल. अनेक प्रकारची रोगराई पसरेल ती कानान ऐकता येईल पण डोळ्याने पाहता येणार नाही. जो कोणी अहंकार करेल त्याला त्याची जागा समजेल. माझी मनापासून सेवा करेल त्याच्यावर कांबळ्याची छत्र धरेन. माझ्या कळपापासून दूर राहशील तर वाया जाशील.
दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मुख्य धार्मिक विधिस प्रारंभ झाला. गावचावडीत मुख्य मानकरी प्रकाश पाटील व रणजित पाटिल यांच्या हस्ते मानाच्या तलवारींचे, शस्त्रांचे पूजन करण्यात आले.यावेळी मानकरी, पुजारी व सेवेकरी उपस्थित होते.भानस मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मुख्य श्री विठ्ठल बिरदेव मंदिरात सर्वजण आले. तेथे दर्शन घेतल्यानंतर फरांडेबाबांना निमंत्रित करण्यात आले.
दुपारी एक वाजता श्री फरांडेबाबा हातात धारदार जोड तलवार घेवून उभे राहिले.’श्री विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलं’ चा गजर सुरु होता. काहि मोजक्या भक्तांच्या आणि मानकरी यांच्या उपस्थित फरांडेबाबांनी श्री विठ्ठल बिरदेव मंदिरात पोटावर मानाच्या तलवारीचे वार करत फरांडेबाबांनी ऐतिहासिक ‘हेडाम’ सोहळ्याचे दर्शन घडविले. यावेळी त्यांनी प्रसिद्ध भाकणूकही केली. भाकणूक झाल्यानंतर फरांडेबाबा दर्शन घेवून मंदिरामागील दगडी गादीवर विराजमान झाले.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल बिरदेव यात्रा रद्द करून केवळ पारंपारिक व धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी गर्दि होवू नये यासाठी पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली हुपरी पोलीसांनी दक्षता घेतली होती.मंदिर परिसर बॅरेकेट लावून पूर्णपणे सील करण्यात आला होता.तर गावाच्या सर्वच प्रवेश मार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवून गावामध्ये परराज्यातील व बाहेरील भक्तांना प्रवेश बंद करण्यात आला होता. यादरम्यान आमदार राजू बाबा आवळे, अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार प्रदिप उबाळे,अप्पर तहसीलदार शरद पाटिल, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, प्रकाश पाटील, गावकामगार पोलीस मोहन वर्धन, तलाठी महेश नागरगोजे यांच्यासह प्रशासकिय अधिकारी उपस्थित होते.