तालुका पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
प्रतिनिधी/ सातारा
सामाजिक व्यवस्थेत पोलीस नसतील तर अशी कल्पना करणे म्हणजे सर्वसामान्यांच्या काळजाचा ठोका चुकतो. पोलिसांमुळेच नागरिक निर्भयपणे जगण्याचा प्रयत्न करतात. मात्र, सध्या सातारा पोलीस दलाचे काम खरंच चांगल्या पध्दतीने सुरु आहे का?, असा प्रश्न पडणारी एक घटना कालपासून सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. एका वॉचमनला साताऱयातील एका बिल्डर, त्याचा मुलगा व सहकाऱयांनी बेदम मारहाण करुन देखील कायद्याला आव्हान देणारी मंडळी बाहेर असल्याची कैफियत वॉचमन महेश हणमंत जाधव याने मांडली आहे. या पोस्टवर सातारकरांनी तीव्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आता पोलिसांना यातील सत्य उजेडात आणून न्याय देण्याची मागणी होत आहे.
दि. 18 रोजी दुपारी 3 च्या सुमारास महेश जाधव याला मारहाण करण्यात आली असून त्यानंतर तो सातारा जिल्हा रुग्णालयात, तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता. मात्र, नवीन वर्ष उजाडले तर त्याला भर दिवसा तो कर्तव्य बजावत होता म्हणून मारहाण करणारे राजरोसपणे बाहेर फिरत उलट महेशसह त्याच्या बाजूने साक्ष देणाऱयांना धमकावत आहेत.
महेश जाधव मोळाचा ओढा परिसरात कच्छी प्रॉपर्टीजच्या वन अर्थ अपार्टमेंटमध्ये एका खासगी सिक्युरिटी एजन्सीमार्फत सिक्युरिटी कर्मचारी म्हणून काम करत आहे. दि. 18 रोजी दुपारच्या वेळी बांधकाम व्यावसायिक सलीम कच्छी, त्यांचा मुलगा व अन्य सात आठजण तिथे आले. त्यावेळी अपार्टमेंटच्या चेअरमन यांनी सूचना केली असल्याने महेशने कच्छी यांना रजिस्टरमध्ये नाव नोंद करण्यास सांगितले. त्यावेळी सलीम कच्छी, त्यांच्या मुलासह सर्वांनी महेशला मारहाण, शिवीगाळ सुरु केली. तू मला का आत सोडले नाहीस असे ते म्हणत होते. त्यावेळी सोसायटीच्या चेअरमन यांनी फ्लॅटधारकांशिवाय कोणालाही आत सोडण्याच्या सूचना केल्या असल्याचे सांगितले. आता यायचे असेल तर रजिस्टरला नोंद करा, असे महेशने सांगितले.
त्यानंतर सलीम कच्छीसह त्याचा मुलगा व मित्रांनी महेशला बेदम मारहाण केली. यावेळी महेशचे इतर सहकारी सिक्युरिटी कर्मचारी सावंत, भुजबळ मारु नका अशी विनंती करत होते. यावेळी मार वाचवण्यासाठी महेश केबिनमध्ये गेला असता, त्यावेळी या सर्वांनी महेशला केबिनमध्ये येवून लोखंडी फायटरने तोंडावर, छातीवर बेदम मारले. त्यामुळे त्याच्या तोंडातून रक्त येवू लागले. त्याच वेळी त्यातील एकाने महेशच्या खिशातील साडेतीन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तुला आता जिवंत सोडणार नाही, असे म्हणत हे सर्वजण तिथे दहशत निर्माण करत होते.
त्यावेळी सोसायटीतील लोक गोळा होवू लागल्यानंतर महेशला मारहाण करणारे हे सर्वजण चारचाकी व दुचाकी वाहनातून पळून गेले. सोसायटीतील लोकांनी नंतर महेशला सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथून सोडल्यानंतर महेशला चक्कर येत असल्याने परत विसावा नाका येथील मंगलमूर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला 21 रोजी डिस्चॉर्ज देण्यात आला आहे.::
चौकट
पोलिसांकडून तक्रार घेतानाच दबाव
पोलिसांनी तक्रार घेतली; पण मी जे सांगितले ते घेतले नाही. तक्रार घेते वेळी माझी मनःस्थिती बरोबर नव्हती. तक्रार घेताना मला वारंवार प्रेशर देत होते व खरं सांगितलेस तर तुला त्रास होईल, असं बोलत होते. मारहाण झाली तेवढेच सांग बाकी हंकारे साहेबांना सांग, असा त्यांचा आदेश आहे, असे पोलीस सांगत होते. त्यामुळे पोलिसांनी प्रथमपासून या प्रकरणात गांभीर्याने कार्यवाही केली नसल्याचे समोर येत असून सातारा तालुका पोलिसांच्या कार्यपध्दतीवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.::
चौकट
कच्छी व मुलांकडून महेशला धमक्या
दवाखान्यातून सोडल्यानंतर महेशच्या तक्रारीवर किरकोळ गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समोर आल्यानंतर महेशने जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची भेट घेतली. त्यांनी परत तक्रार देण्यास सांगितल्यानंतर मग सविस्तर दुसरी तक्रार दाखल सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करुन घेण्यात आली. मात्र, अद्याप पोलीस त्यांना अटक करत नाहीत. तर सलीम कच्छी आणि त्याची मुले आणि त्याची माणसे मला धमकावत आहेत. माझे काही बरे वाईट झाल्यास सलीम कच्छी व त्यांची माणसे जबाबदार असतील. पोलीस त्यांना अटक करत नाहीत उलट मलाच दम देतात. हे असेच चालू राहिले तर मी जगणार कसा, असा सवाल महेश जाधव याने सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये केला आहे.::