दीपक प्रभावळकर / सातारा :
अमेरिकेच्या बिल गेटस्नं केलेलं फंडिंग लोकांना तोंडपाठ आहे, रतन टाटांचं दातृत्व सारा देश अनुभवतोय. महामारीच्या काळात अनेकांनी केलेलं दान ठसठशीत नमुद होतंय. बॉलीवूडमध्ये व्हिलनचं काम करणारा सोनू सूदचं मुंबईचा हिरो ठरलाय… मात्र या साऱ्यांना माग टाकणाऱ्या सातारच्या इंदूआज्जीची कहाणी शिर साष्टांग नमस्कार करायला लावणारी आहे. आज्जीच्या डब्यातला लाडू घेतानासुद्धा थरथरणारे हात अन् ओघळणारे अश्रू कोणी सहृदयी लपवू शकणार नाही.
सातारच्या दस्तगीर कॉलनीच्या खाली एका जुनाट फ्लॅटचं दार उघडचं असतं. आत अर्धमोडक्या खुर्च्या. म्हातारी एकटीच राहते. मुलबाळ कोणी नाही, वयाच्या 85 व्या वर्षी पतीही वारले. वार्धक्यानं त्यांना धड चालता येत नाही. मोडलेला हात अन् थरथरणारं अंग त्यामुळे स्वयंपाक करता येत नसल्यानं सकाळी एक डबा येतो त्यातच दिवसभराचं जेवण होतं. उत्पन्न म्हणाल तर नवऱ्याची अर्धी पेन्शन….. बस्स.
हो, फाटक्या संसारात, अपंग अंगानं राहणारी अन् अर्ध्या पेन्शनचं उत्पन्न असणारी हीच ती इंदूआज्जी रतन टाटा काय बिल गेटस्ला पण मागे टाकतेय. त्याचं कारण म्हणजे संसाराचं फाटकं गाठोडं शिवणाऱ्या इंदूआज्जीनं आजवर अनेक सेवाभावी संस्थांना एक-दोन नव्हे तर दहा लाखाहून अधिक मदत केलीय. डब्याचं बिल भागवून सगळी पेन्शन साठवायची अन् दान द्यायची ! ‘भरपूर जगलेय सगळं अनभवून घेतलंय आता देऊ दे की लोकांना काय तरी’ हे एक वाक्य सांगून इंदूआज्जीनं ‘तरुण भारत’ची मुलाखत संपवली अन् लाडूचा डबा पुढं केला…..!
महामारीच्या काळात शेजारच्या घरातून उसनी साखरं आणणं, कपभर दूध मागणं हे मध्यमवर्गीय समाजाचे सोपस्कार सुद्धा संपून गेलेत. याच काळात इंदूआज्जीची कहाणी काळजाला चिरून जाते. मूळच्या सातारच्या असलेले इंदू सदाशिव कारळे या लग्नानंतर मुंबईला स्थायिक झाल्या. सदाशिव कारळे हे रेल्वेत नोकरीला. लग्नानंतर एक मुलगी झाली पण दिडवर्षांची असतानाच गेली. सेवानिवृत्तीनंतर दोघांनी साताऱयात राहयचा निर्णय घेतला.
सदाशिवराव तसे हौशी. त्यामुळे त्यांनी बायकोची हौस केली. तुटपुंजा पगार अन् त्याहून कमी पेन्शन तरी दोघांनी निम्मा भारत इतकंच काय थायलंड, दुबई, सिंगापूर सारं केलंय. प्रुजची सफर असो कि उंच आकाशातली केबल कार असो इंदुआज्जीनं सगळे अनुभव घेतलेत.
साताऱ्यात आल्यानंतर आपलं जगणं झालंय आता समाजासाठी काय तरी केलं पाहिजे म्हणून त्यांनी पेन्शन साठवून सेवासंस्थांना देण्याला सुरुवात केली. बरं हे दान केल्याचा कांगावा, जाहिरातबाजी सोडाच साधा फोटो पण कधी काढला नाही. आजवर त्यांनी आनंद वृद्धाश्रमाला 5 लाख रूपये, काळूबाई देवस्थान, गोंदवले देवस्थान, सज्जनगड अशा अनेक संस्थानांना प्रत्येकी एक-एक लाख रूपये दिलेत. आता तर काही संस्थांची नावं पण त्यांना आठवत नाहीत. एका पोतडीतल्या वहीत त्याच्या पावत्या मात्र नक्की सापडतात.
साताऱ्यातल्या राजेंद्र चोरगे अन् त्यांच्या बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचं काम सदाशिव कराळेंना भलतंच आवडलं म्हणून त्यांनी एक लाख दिले होते. पण या कामापुढं आपली देणगी फारच थोडी असल्याची त्यांना चुटपूट होती म्हणून पुन्हा पेन्शन साठवून परत एकदा 50 हजाराची देणगी दिली होती.
दरम्यान, दोन वर्षांपुर्वी सदाशिव कारळे वार्धक्याने गेले. आता इंदूआज्जीच्या हातात निम्मिच पेन्शन येतेयं. पतीच्या विरहात त्याही खूप थकल्यात. भराभरा पावलं टाकता येत नाहीत कि स्वतःच्या स्वयंपाक पण करता येत नाही. मुलबाळ कोण नाही तसं पै-पाहुणेही जास्त नाहीत. त्यामुळे दिवसभर खिडकी-दारातून माणसांची वर्दळ बघणं अन् कुणाला तरी मदत केली पाहिजे हाच विचार करत राहणं इतकच ते इंदूआज्जीच्या हाती राहिलंय. एकवेळचा डबा, लाईट-पाणी-पालिकेची बीलं, औषधं झालं की राहिलेली सगळी पेन्शन साठवायची अन् दान द्यायची हाच त्यांचा शिरस्ता. ‘माझ्या मालकांना राजूला लै मदत करायची होती पण त्येवढी झाली नाय’ म्हणून आत्ता 50 हजार देतीया….!
बालाजी ट्रस्टला यापुर्वी 1 लाख, नंतर 50 हजार आणि आता परत 50 हजार देणाऱ्या इंदूआज्जीला रोजचा विचार देण्याचाच येतोय. त्यातही ‘अजून कोणती सेवासंस्था असल तर सांगत जावा हो’ हि तिची आर्त हाक बाकी असतेच.
राजेंद्र चोरगे म्हणजे इंदूआज्जीचा राजू तिच्यासाठी हक्काचा हाय. घरी गेल्यावर लाडूचा डबा पुढं करणार परत लगेच डबा मागे घेणार अन् चहा करणार. लाडू खाल्याव चहा गोड लागणार न्हाय. म्हणून चा पेल्या लाडू खा. ये राजू त्यो फोन बंद पडलाय त्याचं बघं बघू पहिल्यांदा….. असा पण हक्क आहे.
टाटा, बिर्ला, बिल गेटस् यांनी भले अब्जावधी रूपये ओतले असतील. मात्र जितकं आहेत त्यातला तो किती हिस्सा हेता? याचा विचार केला तर सातारची इंदू कारळे जगभरातल्या साऱया दानशूरांची ‘आज्जी’ हाय हे मनोमन पटतं.
मन हलकं करणारं ठिकाण
परवाच माझी आई गेली. लोक अजूनही भेटायला येतायंत. तिच्या आठवणींनी काळीज भरून येतं. आज तब्येत कशी विचारायला आलो होतो. इंदूआज्जीनं नेहमीप्रमाणेच लाडू दिला आणि माझ्या भावनांचा बांध फुटला. अर्धवट खालेल्ला लाडू मुठीत दाबून ठेवत गाडीत आलो. तिच्या पुढं नको म्हणून गाडीत रडून घेतलं, बराच वेळ हुंदका थांबत नव्हता. मला इंदूआज्जीसारख्या लोकांत देव दिसतो. माझ्यासाठी मन हलकं करणारं ठिकाण आहे ते !
-राजेंद्र चोरगे, संस्थापक बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट, सातारा
दीपक प्रभावळकर 9325403232, 9527403232