कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूर पोलीसांनी आपल्या जिवाची बाजी लावून राजस्थानमधील बिष्णोई टोळीच्या म्होरक्यांना जेरबंद करण्यासाठी दाखविलेले समयोचित धाडस आणि कर्तव्यतत्परतेबद्दल गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी पोलीस अधिकारी व कर्मचार्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव केला. कोल्हापूर पोलीस मुख्यालयात हा सन्मान सोहळा पार पडला.
पुणे–बेंगलोर महामार्गावर किणी टोलनाक्यावर मंगळवारी (दि. २८ जानेवारी) रात्री साडेनऊच्या सुमारास पोलीस आणि गुन्हेगारी टोळीमध्ये धुमश्चक्री उडाली होती. पोलीस आणि गुन्हेगारी टोळीमध्ये यावेळी एकमेकांवर झालेल्या बेछूट गोळीबारात एक गुंड जखमी झाला. तर कोल्हापूर पोलिसांनी जिवाची बाजी लावून राजस्थानमधील बिष्णोई टोळीच्या म्होरक्यांसह सराईत गुंडांना जेरबंद केले होते. या कुख्यात ‘बिष्णोई’ टोळीकडून अंमली पदार्थ आणि शस्त्रांची तस्करी केली जात असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.