बिहार विधानसभा महासंग्रामाचे बिगूल वाजले असून, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवरील या पहिल्या वहिल्या निवडणुकीकडे अवघ्या देशाचे लक्ष असेल. 28 ऑक्टोबर आणि 3 व 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यात होणाऱया या निवडणुकीचा निकाल 10 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. त्यामुळे स्वाभाविकच मोदी-नितीश यांची जोडीच अजोड कामगिरी बजावणार की तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील राजद-काँग्रेस महागठबंधन नव्याने तळपणार, याचे उत्तर याच दिवशी मिळू शकेल. 243 सदस्य संख्या असलेल्या बिहारचा देशातील महत्त्वाचे राज्य म्हणून उल्लेख केला जातो. जित्याजागत्या राजकारणासाठी प्रसिद्ध असलेल्या या राज्यातील जनमताचा कौल राष्ट्रीय स्तरावरील राजकीय वाऱयांची दिशा ठरवितो, असेही मानतात. अशा या राजकीयदृष्टय़ा संवदेनशील प्रदेशातील सध्याच्या उलथापालथी पाहता ही निवडणूक अनेकार्थांनी वेगळी ठरणार, हे निश्चित आहे. राज्याच्या राजकारणावर पक्की मांड असलेले नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालीच जदयू-भाजप व मित्रपक्षांची आघाडी निवडणुकीला सामोरी जाईल. नितीशकुमार हे लोकप्रिय मुख्यमंत्री मानले जातात. बिहारचा चेहरामोहरा बदलण्यात त्यांनी नि:संशय महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. स्वाभाविकच त्यांचे नेतृत्व व मोदींचा करिष्मा या दोन्हीवर या आघाडीची भिस्त असेल. किंबहुना, कोरोना काळातील बिहारमधील ढासळलेली आरोग्य व्यवस्था व महाराष्ट्रासारख्या राज्यातून स्वगृही परतलेल्या मजुरांना रोजगार देण्यात आलेले अपयश यामुळे सत्ताधाऱयांबद्दल काहीशी नाराजीही दिसून येते. कृषी विधेयकावरूनही अद्याप शेतकऱयांमध्ये काहीशी संभ्रमाची स्थिती आहे. हे पाहता पुन्हा बाजी मारण्यासाठी नितीश यांना निश्चितपणे अधिकची ताकद लावावी लागेल. आघाडीमध्ये अद्याप जागावाटप झाले नसले, तरी जदयू 104, भाजपा 102 च्या आसपास जागा लढवेल, असे चित्र आहे. उर्वरित जागा पासवान यांची लोकजनशक्ती पार्टी, जीतनराम मांझी यांचा हिंदुस्थानी अवाम मोर्चा व अन्य पक्षांना दिल्या जातील. रामविलास पासवान यांची प्रकृती ठीक नसल्याने लोकजनशक्तीच्या नेतृत्वाची कमान चिराग पासवान हे सांभाळत आहेत. किंबहुना, जागावाटपावरून पासवान नाराज दिसतात. त्यामुळे त्यांची नाराजी दूर होणार का, हा महत्त्वाचा मुद्दा असेल. काँग्रेस व राजदच्या महाआघाडीचे नेतृत्व तेजस्वी यादव यांच्याकडे असेल. लालूप्रसाद तुरुंगात असले, तरी मार्गदर्शकाच्या भूमिकेत ते राहतीलच. लालू कितीका वादात असेनात, त्यांना मानणारा एक वर्ग आहे. त्यात नव्या दमाच्या तेजस्वी यांनी पक्षात जान भरल्याने राजद कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतो. राजद व काँग्रेसधील जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असून, काँग्रेससाठी 58 ते 60 जागा सोडल्या जाऊ शकतात. दुसऱया बाजूला सध्या तुरुंगात असलेला बाहुबली नेता आनंद मोहनसिंह यांची पत्नी लवली आनंद यांचा पक्षप्रवेश राजदसाठी दिलासा म्हणायला हवा. मागील निवडणुकीत लवली यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासाठी प्रचार केला होता. दुसऱया बाजूला महाआघाडीपासून फारकत घेतलेल्या रालोसपाच्या उपेंद्र कुशवाह यांनी एनडीएत सामील होण्याच्या चर्चेलाही पूर्णविराम दिला आहे. त्यांनी आता तिसऱया आघाडीचा पर्याय स्वीकारला आहे. मायावतींच्या बसपासोबत त्यांचा पक्ष मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. या आघाडीचा फारसा प्रभाव पडला नाही, तरी त्यांची मते नक्कीच निर्णायक ठरू शकतील. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही एमआयएमला साद घालत रणांगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत. आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत 11 जागांवर काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीला आपले उपद्रवमूल्य दाखवून दिले होते. विधानसभेत या दोन्ही पक्षांची मैत्री टिकली नसली, तरी तेथेही 33 जागांवर आघाडीला त्यांनी दणका दिला होता. आता एनडीएला पराभूत करण्यासाठी मैदानात उतरणार असल्याचे सांगणारा आंबेडकरांचा पक्ष बिहारमध्ये प्रत्यक्षात महाआघाडीसाठीही किंचित का होईना मारक ठरू शकतो, हे लक्षात घ्यायला हवे. सेना व भाजपातील गुप्तगूही समजून घ्यायला हवे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खासदार संजय राऊत यांच्यातील भेट बरेच काही सांगून जाते. फडणवीस यांच्याकडे बिहारची जबाबदारी आहे. सेना बिहार निवडणुकीत उतरल्यास हिंदू मतांचे विभाजन होऊ शकते, हा धोका लक्षात घेऊन ही भेट झाल्याची वदंता आहे. अर्थात हा करार एकतर्फी नसेल. विरोधक म्हणून भाजपालाही त्याची किंमत चुकवावी लागेल, हे वेगळे सांगायला नको. सध्या देशभर कोरोनाचा कहर आहे. अशा वातावरणात होणारी ही निवडणूक, तिचे व्यवस्थापन एक कसोटीच असेल. प्रत्येक मतदान केंद्रावर सॅनिटायझर, हातमोजे, मास्कसारख्या वस्तूंचा पुरवठा करावा लागणार आहे. हे पाहता ती प्रचंड खर्चिक राहील. कोरोनाबाधित रुग्णांना शेवटच्या तासाभरातच मतदान करता येणार असून, उमेदवारांसाठीही प्रचारयंत्रणा राबविणे दिव्य राहील. बिहारमध्ये एकूण 7 कोटी 21 लाख मतदार आहेत. सद्य:स्थिती बघता मतांची टक्केवारी घटण्याची दाट शक्यता आहे. ती अधिक प्रमाणात घटली, तर त्याचा निकालावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे निवडणुकीचे टायमिंग चुकले का, ती नंतर घेतली असती, तर काय बिघडले असते, असे म्हणण्यास नक्कीच वाव आहे. अंतिमत: नितीश यांचा अनुभव व तेजस्वी यांचे तरुण नेतृत्व यांच्यातीलच ही लढाई असेल. नितीश यांच्याकडे आजमितीला प्रशांत किशोर यांच्यासारखा चाणक्य नसला, तरी खास सहकाऱयांची मजबूत फळी आहे. तुलनेत तेजस्वी यांच्या दिमतीला अशी फौज दिसत नाही. तरी ऐन मोक्याच्या क्षणी रोजगाराचा मुद्दा ऐरणीवर आणून त्यांनी सत्ताधाऱयांना तगडा शह दिला आहे. डावे, शरद यादव विरोधकांकडे झुकलेले दिसतात. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात काय होते व समीकरणे कशी जुळतात, यावर बरेच काही अवलंबून राहील. या निवडणुकीचा निकाल काही असो. पण, त्याचा भारतीय राजकारणावर दूरगामी परिणाम होणार, हे नि:संशय.
Previous Articleसहिष्णू भाषा
Next Article पंजाबमध्ये 1,100 नवे कोरोना रुग्ण
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.