परस्परांवर आरोप-प्रत्यारोपाचे नेत्यांदरम्यान सत्र : पक्षाच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीच्या पराभवाचे खापर काँग्रेसवर फुटल्यावर पक्षाचे नेते परस्परांवर ठपका ठेवत आहेत. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी पक्षाच्या नेतृत्वावरच प्रश्न उपस्थित केले आहेत. लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी मात्र सिब्बल यांनाच लक्ष्य केले आहे. बिहार तसेच विविध राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत कुठलेच योगदान न देणाऱयांनी काहीही बोलण्यापूर्वी विचार करावा. काही न करता बोलण्याचा अर्थ आत्मविश्लेषण नसल्याचे चौधरी यांनी म्हटले आहे.
काँग्रेस पक्ष आणि आत्मविश्लेषणाच्या गरजेसंबंधी सिब्बल अत्यंत चिंतित आहेत, परंतु बिहार, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश किंवा गुजरात निवडणुकांमध्ये त्यांचा चेहरा दिसून आला नसल्याची उपरोधिक टीका चौधरी यांनी केली आहे.
संशय व्यक्त करणारे आणि वारंवार अस्वस्थ होणारे अनेक सहकारी पक्षात आहेत. काँग्रेसच्या उदारमतवादी मूल्यांच्या राजकारणाला लोकांचे समर्थन मिळत नसल्यास पक्षाने मध्यम मार्ग अवलंबिण्याऐवजी दीर्घ संघर्षासाठी तयार रहावे, असे विधान काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी केले आहे.
काँग्रेसच्या नेतृत्वाने बहुधा प्रत्येक निवडणुकीत पराभवालाच स्वतःचे नशीब मानल्याचे वाटते. बिहारच नव्हे तर पोटनिवडणुकांमधील निकाल पाहता देशाचे लोक काँग्रेसला प्रभावी पर्याय मानत नसल्याचे जाणवते असे सिब्बल यांनी एका मुलाखतीत नमूद केले होते. काँग्रेस महाचिव तारिक अन्वर यांनीही बिहार निवडणुकीवरून पक्षाने आत्मचिंतन करावे असा सल्ला दिला होता.
बिहार निवडणूक आणि मध्यप्रदेश पोटनिवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मदतीसाठी स्थापन विशेष समितीची बैठक पार पडली आहे.