वैशाली / वृत्तसंस्था :
नागरिकत्व सुधारणा कायद्याला काही लोक मतपेढीच्या कारणामुळे विरोध करत आहेत. नागरिकत्व सुधारणा कायद्याला बिहारमध्ये चांगली प्रतिक्रिया प्राप्त झाली आहे. लालूप्रसाद यादव, ममता बॅनर्जी, राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल हे जनतेची दिशाभूल करत आहेत. या कायद्याने कुणाचेच नागरिकत्व हिरावून घेतले जाणार नसल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वैशाली येथे गुरुवारी आयोजित जाहीर सभेत म्हटले आहे. तसेच शाह यांनी यावेळी बिहारमध्ये नितीश कुमार यांच्याच नेतृत्वाखाली रालोआ विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे.
विरोधी पक्षांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात दंगली घडवून आणल्या आहेत. याच कारणामुळे विरोधकांचे दुष्ट हेतू हाणून पाडण्यासाठी भाजपला देशभरात सभा घ्याव्या लागत आहेत. पाकिस्तानात कुटुंबीयांच्या डोळय़ांदेखत महिलांवर बलात्कार करण्यात आले, त्यांची मालमत्ता हिसकावून घेण्यात आली, धार्मिकस्थळांना अपवित्र करण्यात आले होते. या छळाला कंटाळूनच तेथील हिंदू, शीख, बौद्ध, ख्रिश्चन जैन, पारशी भारतात आल्याचे शाह म्हणाले.
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या माध्यमातून अनेक पीडितांना लाभ मिळणार आहे. काँग्रेसने धर्माच्या आधारावर देशाची फाळणी केल्यानेच लाखो शरणार्थी भारतात आले. पाकिस्तानात राहिलेल्या हिंदू, बौद्ध, जैनधर्मीयांवर अत्याचार झाले. मंदिर, गुरुद्वारा तोडण्यात आल्यावर या लोकांना भारतात येण्याशिवाय दुसरा मार्गच राहिला नसल्याचे शाह म्हणाले.
संजद-भाजप आघाडी अतूट
भाजप आणि संजदमधील आघाडी अतूट आहे. पुढील विधानसभा निवडणूक आम्ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालीच लढविणार आहोत. संजद आणि भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवतील अशी अफवा काहीजण पसरवित असल्याचा दावा शाह यांनी केला आहे.
लालू यादवांवर टीका
लालूप्रसाद यादव हे बिहारमध्ये कंदिलयुग सोडून गेले होते, पण आम्ही एलईडीचा काळ आणला आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील रालोआच पुन्हा सत्तेवर येणार आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांना रोखण्यासाठी काँग्रेस सरकार कुठलीच पावले उचलत नव्हते. मनमोहन सिंग यांनी गप्प बसणे पसंत केले होते. पण मोदींनी एअरस्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानला धडा शिकविला आहे. लालू अँड कंपनीने सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले होते. लालू यादव, केजरीवाल, ममता बॅनर्जी आणि इम्रान खान यांची भाषा एकसारखीच असल्याची प्रखर टीका शाह यांनी केली आहे.
तुकडे-तुकडेवाल्यांवर कारवाई
भारतमातेचे तुकडे करण्याची घोषणा देणाऱयांना तुरुंगाची हवा खावी लागणार असल्याचे ममता बॅनर्जी, राहुल गांधी, डावे, केजरीवाल यांनी लक्षात घ्यावे. देशभरात झालेल्या दंगलींसाठी काँग्रेस, ममता, केजरीवाल आणि लालू यादव जबाबदार आहेत. काँग्रेसने अल्पसंख्याकांची दिशाभूल केल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्र्यांनी केला आहे.