बिहारमध्ये तीन टप्प्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनेही स्वतःचे उमेदवार उभे केले होते. बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात सत्तारुढ संयुक्त जनता दल आणि भाजप यांच्या रालोआच्या विरोधात राजदप्रणित काँग्रेस, डाव्या पक्षांच्या महाआघाडीने दमदार आव्हान उभे केले होते.
बिहारमध्ये भाजपप्रणित रालोआची सत्तेच्या दिशेने असणारी घौडदौड कायम राहिली आहे. मात्र त्याचवेळी या निवडणुकीत 50 जागा लढविणाऱया शिवसेनेला नोटापेक्षाही कमी मते मिळाली आहेत.
या निवडणुकीत राजदला सर्वाधिक म्हणजेच 22 टक्क्यांहून अधिक मते प्राप्त झाली आहेत. तर भाजपला 19 टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत. त्याखालोखाल संजद 15 टक्के तर काँग्रेसला 9 टक्क्यांहून अधिक मते पटकाविता आली आहेत. विशेष म्हणजे बिहारमध्ये निवडणूक लढविणाऱया शिवसेनेला 0.05 टक्के मते प्राप्त झाली आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे शिवसेनेपेक्षा नोटा पर्यायाला अधिक म्हणजेच 1.74 टक्के मते मिळाली आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस आणि शिवसेनेला एकत्र आणत महाविकास आघाडीची मोट बांधणाऱया राष्ट्रवादीलाही बिहारमध्ये फारसे यश मिळू शकलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला 0.23 टक्के मते प्राप्त झाली आहेत.
अभिनेता सुशांत सिंग राजपूर आत्महत्या प्रकरणावरून मुंबई पोलीस विरुद्ध बिहार पोलिसांमध्ये चांगलाच संघर्ष झाल्याचे पहायला मिळाले होते. अशी पार्श्वभूमी असूनही शिवसेनेने बिहारच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला होता.