जेडीयू भाजपसोबतची युती तोडणार?ः आरजेडी-काँग्रेसशी जवळीक साधण्याच्या तयारीत
पाटणा / वृत्तसंस्था
बिहारमध्ये राजकीय वातावरण तापले असून सत्ताबदलाची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या पक्षाच्या खासदार-आमदारांची बैठक मंगळवारी आमंत्रित केली असून या बैठकीत भाजपपासून फारकत घेण्याचा निर्णय घेतला जाण्याची अटकळ बांधली जात आहे. या बैठकीतील चर्चेअंती मुख्यमंत्री नितीशकुमार काही मोठा निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. याचदरम्यान, मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपशी संबंध तोडल्यास त्यांना आणि त्यांच्या पक्षाला साथ देण्याची तयारी बिहार विधानसभेतील प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) दर्शवली आहे. आरजेडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवानंद तिवारी यांनी सोमवारी यासंबंधी स्पष्ट संकेत दिले.
जनता दल युनायटेड (जेडीयू) आणि भाजप यांच्यातील ‘विवादा’च्या अटकळींमुळे राज्यात राजकीय वातावरण तप्त झाले आहे. सत्ताधारी जेडीयूने आपल्या खासदार आणि आमदारांना पाटण्यात बोलावले आहे. तसेच तसेच आरजेडी आणि काँग्रेसनेही आपापल्या पक्षांच्या आमदारांना पाटण्यात उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सर्व जलद घडलेल्या घडामोडींवरून राजकीय उलथापालथ होण्याची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये रंगली आहे. बिहारमधील गेल्या काही दिवसांतील बदललेल्या राजकीय परिस्थितीचा संदर्भही यानिमित्ताने दिला जात आहे.
नितीशकुमारांचा सोनियांशी संवाद
मुख्यमंत्री नितीश कुमार आणि जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष लालन सिंह मंगळवारी पक्षाच्या खासदार आणि आमदारांसोबत बैठक घेणार आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय जनता दलाच्या सर्व आमदारांनाही पाटण्यात बोलावण्यात आले आहे. तेजस्वी यादव हे आपल्या पक्षाच्या आमदारांना भेटू शकतात, असे सांगण्यात येत आहे. या सगळय़ात काँग्रेसने विधिमंडळ सदस्यांची बैठकही बोलावली आहे. तसेच मुख्यमंत्री नितीशकुमार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात झालेल्या संवादामुळे राज्यात राजकीय खळबळ उडाली आहे.
लालन सिंह यांची सारवासारव
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष लालन सिंह यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ही बैठक आरसीपी सिंह प्रकरणासंदर्भात बोलावण्यात आली आहे. आरसीपी सिंह जेडीयूमधून बाहेर पडल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर नितीशकुमार आपल्या आमदार आणि खासदारांचे मत जाणून घेतील असे जेडीयू विधिमंडळ पक्षाच्या बैठकीबाबत लालन सिंह यांनी सांगितले.
भाजपचे दिग्गज नेते दिल्लीत
बिहारमध्ये सध्या राजकीय घमासन शिगेला पोहोचले असतानाच भाजपचे अनेक दिग्गज नेते बिहारमधून दिल्लीला रवाना झाले. राजकीय गदारोळादरम्यानच ज्येष्ठ नेत्यांनी दिल्ली गाठल्यामुळे राजकीय चर्चा वाढली आहे. दिल्लीला जाणाऱयांमध्ये भाजपचे ज्ये÷ नेते आणि उद्योगमंत्री शाहनवाज हुसेन, मंत्री नितीन नवीन, रविशंकर प्रसाद, सतीशचंद्र दुबे आदींचा समावेश आहे. हे सर्व नेते सोमवारी सकाळीच दिल्लीला रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी जेडीयूने आपल्या खासदारांना दिल्लीहून पाटण्याला येण्याच्या सूचना दिल्या आहेत.
चिराग पासवान यांचा नितीशकुमारना टोला
लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) प्रमुख आणि खासदार चिराग पासवान यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची खिल्ली उडवली आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची हिंमत दाखवल्यास त्यांना दुहेरी आकडाही पार करता येणार नाही, असे ते म्हणाले. नितीशकुमार यांना आपले विकासाचे मॉडेल योग्य वाटत असेल तर त्यांनी कुणाशीही युती न करता स्वबळावर निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हानच पासवान यांनी दिले आहे. आरसीपी सिंह स्वतः सक्षम आहेत. ते बोलायला लागले तर मुख्यमंत्र्यांना शब्दही फुटणार नाहीत, असे ते पुढे म्हणाले.
पाटण्यात राजकीय बैठकांची फेरी
जेडीयूने मंगळवारी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आपल्या सर्व आमदार-खासदारांची बैठक बोलावली आहे. त्याचवेळी राजदने मंगळवारी पाटणा येथील राबडीदेवी यांच्या निवासस्थानी आपल्या आमदारांची बैठक बोलावली आहे. आरजेडीने आपल्या आमदारांना बुधवारपर्यंत पाटण्यात राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुसरीकडे काँग्रेस बिहारमधील राजकीय परिस्थितीवरही लक्ष ठेवून आहे. सोमवारी रात्री काँग्रेसच्या काही नेत्यांची एकत्रित बैठकही झाली.
बिहार विधानसभेतील पक्षनिहाय बलाबल
बिहार विधानसभेची एकूण सदस्यसंख्या 243 इतकी असून सत्ताधारी एनडीए आघाडीकडे सध्या 127 सदस्य आहेत, तर आरजेडीच्या नेतृत्वाखालील विरोधी महाआघाडीकडे 96 सदस्य आहेत. तसेच अन्य पक्षांपैकी काँग्रेसचे 19 आणि एआयएमआयएमचा एक सदस्य आहे. विधानसभेत 80 आमदारांसह आरजेडी हा सर्वात मोठा पक्ष आहे. तर 77 आमदारांसह भाजप दुसऱया क्रमांकाचा आणि जेडीयू 45 सदस्यांसह तिसऱया स्थानावर आहे. एकंदर भाजपची साथ सोडून सरकार स्थापन करायचे झाल्यास नितीशकुमारांना आरजेडीसह इतर पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे.
एकूण सदस्यसंख्या 243
सत्ताधारी पक्ष (127) ः भाजप (77), जेडीयू (45), हम (4), अपक्ष (1)
विरोधी पक्ष (96) ः आरजेडी (80), भाकप-एमएल (12), माकप (2), भाकप (2)
इतर (20) ः काँग्रेस (19), एमआयएम (1)