मुख्यमंत्री नितीश कुमारांनी बोलाविली आमदार अन् खासदारांची बैठक
वृत्तसंस्था / पाटणा
आरसीपी सिंह यांनी संयुक्त जनता दलाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यावर बिहारमध्ये राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याचदरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सर्व आमदार अन् खासदारांना सोमवारी संध्याकाळपर्यंत राज्याची राजधानी पाटण्यात येण्यास सांगितले आहे. संजदच्या आमदारांची बैठक मंगळवारी होणार आहे. या बैठकीचा विषय अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही, भाजपसोबत असलेल्या आघाडीच्या भवितव्याबद्दल यात निर्णय होणार असल्याचे मानले जात आहे.
याचबरोबर राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या राजदनेही मंगळवारी विधिमंडळ गटाची बैठक बोलाविली आहे. तर दुसरीकडे रालोआत सामील हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे अध्यक्ष जीतनराम मांझी यांनीही आमदारांची बैठक आयोजित केली आहे.
संजद केंद्रीय मंत्रिमंडळात सामील होणार नाही. नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात संजदच्या कोटय़ातून कुणालाच मंत्री केले जाणार नाही. यासंबंधी नितीश कुमार यांनी पूर्वीच घोषणा केली असून ही भूमिका अद्याप कायम असल्याचे विधान संजद नेते तसेच बिहारचे शिक्षणमंत्री विजय चौधरी यांनी केले आहे.
माजी केंद्रीय मंत्री तसेच संजद अध्यक्ष राहिलेले आरसीपी सिंह यांच्यावर पक्षाकडून बेहिशेबी मालमत्ता जमविल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर आरसीपी सिंह यांनी संजदला रामराम ठोकला होता. नितीश कुमार यांच्यासोबत सिंह यांचे दीर्घकाळापासून खटके उडत होते. संजदने आरसीपी सिंह यांना राज्यसभेची उमेदवारी नाकारल्याने त्यांना केंद्रीय मंत्रिपद सोडावे लागले होते. आरसीपी सिंह हे केंद्रात संजदच्या कोटय़ातून एकमेव मंत्री होते.
देशात 2024 मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे, तर त्यांनतर एक वर्षाने बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होईल. आगामी दोन्ही निवडणुका संजदसोबत मिळून लढविल्या जातील, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पाटणा येथील भाजपच्या संमेलनादरम्यान जाहीर केले होते. परंतु संजद नेते आघाडीबद्दल स्पष्टपणे बोलणे टाळत आहेत. भाजपसोबत आघाडीची बाब नाकारत नाही आहोत. परंतु सध्या यावर चर्चा करण्याची कुठलीच गरज नाही. निवडणूक नजीक येताच त्यावर निर्णय घेऊ असे संजद अध्यक्ष ललन सिंह यांनी अलिकडेच म्हटले आहे.
सत्तारुढ पक्ष अन् विरोधी पक्षांच्या आमदारांच्या बैठक एकाच दिवशी म्हणजेच मंगळवारी आयोजित होणे हा योगायोग असू शकत नसल्याचे जाणकारांचे मानणे आहे. आरसीपी सिंह यांचा उल्लेख करत संजद अध्यक्ष ललन सिंह यांनी भाजपला लक्ष्य केले आहे. याचमुळे भाजपसोबतच्या आघाडीबद्दल मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.