बेगुसरायमधील दुर्घटना ः राज्य सरकार बनले टीकेचे धनी
बेगुसराय / वृत्तसंस्था
बिहारमधील बेगुसरायच्या साहेबपूर कमल ब्लॉकमध्ये आहोक घाट गंडक नदीवर बांधलेला पूल उद्घाटनापूर्वीच कोसळल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. सुमारे 13 कोटी 43 लाख रुपये खर्चून बांधलेला पूल नुकताच मातीच्या भिंतीसारखा कोसळला. माजी राज्यमंत्री आणि विद्यमान आमदार परवीन अमानुल्ला यांच्या शिफारशीवरून हे पूल बांधण्यात आले होते. या पुलाची पायाभरणी साहेबपूर कमल मतदारसंघाचे माजी आमदार श्रीनारायण यादव यांनी 2016 मध्ये केली होती.
नाबार्ड योजनेंतर्गत 13 कोटी 43 लाख रुपये खर्चून उच्चस्तरीय आरसीसी पूल बांधण्यात आला होता. पुलाची लांबी 206 मीटर तर रुंदी साडेसात मीटर इतकी होती. पुलाचे काम कार्यकारी अभियंता, ग्रामीण बांधकाम विभाग-बलिया यांच्या अखत्यारित करण्यात आले होते. पूल कोसळल्यामुळे सुमारे 30 हजार लोकांचा संपर्क तुटला आहे. पुलाच्या बांधकामामुळे आता अल्पावधीतच नदी ओलांडून आपल्या इच्छित स्थळी पोहोचता येईल, अशी आशा लोकांमध्ये निर्माण झाली होती. पुलावरून वाहतूकही सुरू होती. मात्र, त्याचे उद्घाटन अद्याप झाले नव्हते. साहेबपूर कमलच्या विष्णुपूर आहोक पंचायतीत पूल नसल्यामुळे आता खगरिया जिल्हा मुख्यालयातून 15 ते 20 किलोमीटरचा प्रवास करावा लागणार असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
पूल कोसळल्यामुळे लोकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच राज्य सरकारवर टीकेची झोडही सुरू झाली आहे. राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाचे नेते संजय यादव यांनी सोमवारी बाधित लोकांबद्दल चिंता व्यक्त करत पूल कोसळल्यामुळे विद्यार्थी आणि आजारी लोकांना सर्वात जास्त त्रास होईल, असा दावा केला. आता त्यांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. आता येथील लोकांना एचएच-31 वरील मुख्य रस्त्यावर जाण्यासाठी अनेक गावातून जावे लागणार आहे.
बिल्डरवर कारवाईची मागणी
पूल कोसळल्याची बातमी समजताच परिसरात लोकांची गर्दी झाली. नगर परिषद निवडणुकीमुळे प्रशासकीय अधिकारी निवडणूक डय़ुटीवर होते. स्थानिक आमदार सतानंद संबुद्ध उर्फ लालन यादव सध्या विधानसभेच्या अधिवेशनात आहेत. परिस्थिती पाहून माजी मुख्याधिकारी मनोज कुमार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून निकृष्ट बांधकाम करणाऱयावर कारवाई करून पैसे वसूल करून पूल नव्याने बांधण्याची मागणी केली आहे.
दोन दिवसांपूर्वीच रोखली होती वाहतूक
बेगुसरायचे जिल्हा दंडाधिकारी रोशन कुशवाह यांनी दोन दिवसांपूर्वीच या पुलावरील वाहतूक रोखली होती. पुलावरील पाया क्रमांक 2-3 मध्ये एक क्रॅक दिसल्यानंतर बांधकाम विभागाच्या अधिकाऱयांनी तपासणीनंतर शनिवारी तो बंद केला होता. याबाबत अधिक तपासाचे आदेश देण्यात आले असून सरकारी निधीचा गैरवापर झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱयांनी दिला आहे.