वृत्तसंस्था / गोपालगंज :
बिहारच्या गोपालगंज जिल्हय़ातील वैकुंठपूर येथील एक मार्गसेतू उद्घाटनाच्या 29 दिवसांनीच वाहून गेला आहे. हा सेतू सोती नदीवर उभारण्यात आला होता आणि 16 जून रोजी याचे उद्घाटन करण्यात आले होते. या सेतूच्या उभारणीसाठी 264 कोटी रुपयांचा खर्च आला होता. अतिवृष्टीमुळे नदीने उग्र रुप धारण केले आहे. याप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.
सेतूच्या निर्मितीवेळी प्रक्रियेचे योग्य पालन करण्यात आले नव्हते. निर्मितीकार्यात भ्रष्टाचार झाल्याने सेतूचा पाया ठिसूळ होता. पुराच्या पाण्याचा दबाव झेलू न शकल्याने सेतूचा मोठा भाग वाहून गेला आहे. सेतू निर्माण करणाऱया वशिष्ठी कंपनीची चौकशी केली जावी अशी मागणी मुख्य विरोधी पक्ष असलेल्या राजदने केली आहे.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी धाडस दाखवून सार्वजनिक बांधकाम मंत्री नंदकिशोर यादव यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी तेजस्वी यादव यांनी केली आहे. तर मुख्य सेतू नव्हे तर जोडरस्ता वाहून गेल्याचा दावा मंत्री नंदकिशोर यादव यांनी केला आहे. 1440 मीटर लांबीचा आणि 15 मीटर रुंदीचा हा सेतू निर्माण करण्यास 8 वर्षांचा कालावधी लागला होता. हा सेतू गोपालगंज-पूर्व चंपारण्य जिल्हय़ांना जोडतो.