ऑनलाईन टीम / पटना :
बिहारमध्ये मागील तीन दिवसात 32 जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये भागलपूरमधील 16, बांकातील 12, मधेपुरातील 3 आणि नालंदा येथील एकाचा समावेश आहे. बिहारमध्ये बनावट दारु विक्री सुरु असून ही दारु प्यायल्यामुळेच या लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मृतांच्या नातेवाईकांनी दिली आहे. पण सध्या याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. सर्व मृतदेहांचे पोस्टमार्टम केले जात आहे. पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल, असे बांका एसपी अरविंद कुमार गुप्ता यांनी सांगितले.
मधेपुरा जिल्ह्यातील मुरलीगंजमध्ये होळीच्या दिवशी विषारी दारु प्यायल्याने 22 जण आजारी पडले आहेत. दारु प्यायल्यानंतर तब्येत खराब झालेल्या सर्वांना मुरलीगंज पीएचसी आणि खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. यापैकी 4 जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. विषारी दारू हे या मृत्यूंमागचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. यापैकी 3 मृत दिघी गावातील असून एक जण मुरलीगंज मुख्य बाजारपेठेतील प्रभाग 9 मधील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
भागलपूर, बांका आणि नालंदा येथील लोकांचाही अशाच प्रकारे विषारी दारूने मृत्यू झाला आहे. एवढंच नाही तर भागलपूरमध्ये 2, बांकामध्ये 6 आणि मधेपुरामध्ये 12 लोक आजारी असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, बनावट दारूमुळं मृत्यू झाल्याची पुष्टी अद्याप झाली नाही.