सर्कशीमध्ये अलीकडे जंगली प्राण्यांना मनाई केल्यानंतर जर रोमहर्षक वाटावे असे काही उरले असेल तर ते केवळ आणि केवळ उंचावर घेतले जाणारे झोके आणि आणि अवकाशात एकाचा हात सोडून दुसऱयाचा हात पकडण्याची कसरत! बिहारला जंगलराज असले तरी कौतुकाने लोकशाहीची जन्मभूमी वगैरे म्हटले जाते! चारा घोटाळय़ात अडकल्याने लालूप्रसाद जेलचा चारा खात आहेत. संयुक्त जनता दलाचे नितीशकुमार पंधरा वर्षे मुख्यमंत्री राहिल्याने विरोधी पक्षांना तर नको आहेतच पण सत्तारूढ भाजपलाही नकोसे झाले आहेत. त्यामुळे राजकीय कोलांटउडय़ा वाढल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचे अर्ज भरायचे चार दिवस उलटले तेव्हा रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाचा नवा नायक चिराग पासवान याने आपला पक्ष बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या विरोधात निवडणूक लढवेल मात्र आपल्या आमदारांचा पाठिंबा भाजपच्या मुख्यमंत्र्याला राहील असे सोमवारी जाहीर केले. पासवान पुत्राच्या या बंडखोरीमागे भाजपच आहे असे म्हणतात. 2017 साली मणिपूरमध्ये पासवान यांचा पक्ष स्वतंत्र लढला आणि निकालानंतर भाजपच्या वीरेंद्रसिंह सरकारचा भाग बनला. आता मणिपूर पॅटर्नचे रसायन बिहारच्या प्रयोगनळीत तापवले जात आहे. लालूप्रसाद आणि पासवान यांना आपले पुत्र राज्याच्या मुख्य धारेच्या नेतृत्वात आणायचे आहेत. भाजपला नितीशकुमार यांची पाठ सोडायची आहे. त्यामुळे तिथे सत्तेचा जो खेळ सुरू झाला आहे तो सर्कशीपेक्षा वेगळा नाही. विशेष म्हणजे सर्वच नेत्यांना तिथे आपली सत्ता हवी आहे पण आपल्या मित्र पक्षावर कोणाचाही विश्वास नाही. त्यामुळेच तेजस्वी यादवच्या तंबूतून आधी ओबीसी नेते कुशवाहा आणि नंतर जीतनराम मांझी या दलित नेत्याने थेट नितीश यांच्या तंबूत उडी टाकली आहे. नितीश यांना पासवान ऐवजी आपले समीकरण पूर्ण करायला एक दलित नेता हवा होता. भाजपला पासवान यांना सोडायचे नाही. गत निवडणुकीत मोहन भागवत यांनी आरक्षणावर केलेल्या वक्तव्याने भाजपचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे यंदा पासवान यांना न दुखावता ही निवडणूक कशी पार पाडता येईल याची रणनीती भाजप आखत आहे. त्यामुळेच नितीशकुमार 12 कोटी बिहारींच्या जीवनाशी खेळत आहेत. त्यांना मत देणे म्हणजे आपल्या मुलांना या राज्यातून पलायन करायला लावण्यासाठी मतदान केल्यासारखे आहे. अशा टीकेनंतरही भाजपने पासवान यांची साथ सोडली, असे म्हटले नाही. पण, निवडणुकीचे नेतृत्व नितीशकुमारच करत आहेत असे म्हणायलाही ते विसरले नाहीत! आपले जुने साथीदार सोडून गेल्यानंतर तेजस्वी यादवही भाजपशी समझोता करेल, प्रत्येक जण आपापल्या व्होट बँकेप्रमाणे सत्तेचा वाटा मिळवण्यासाठी झटतील असे चित्र दिसत आहे. अर्थात असल्या सर्कशीची बिहारला सवय आहे. बिगर काँग्रेसवादाने या नेत्यांना अनेकदा एकत्र आणले आणि आपला कार्यभाग आटोपल्यानंतर त्यांनी लाथा झाडल्याच आहेत! 2005 साली पासवान यांनी लालूंच्या विरोधात उमेदवार उभे करून त्यांना सत्ताभ्रष्ट केले होते. आता पंधरा वर्षांनी त्यांचा चिराग तेच राजकारण खेळत आहे. मिळणार नाहीत हे पक्के माहीत असताना त्याने 42 जागा मागितल्या. आता 242 पैकी 143 जागांवर त्यांचे उमेदवार उभे राहणार आहेत. म्हणजेच संयुक्त जनता दलाच्या विरोधात सव्वाशे आणि भाजपच्या विरोधात अठरा-वीस उमेदवार उभे केले जाणार! बिहारची लढाई पूर्वी राजद विरुद्ध संजद म्हणजे ’ग्वाला विरुद्ध लाला’ अशी व्हायची. त्यात दलितांची मते निर्णायक बाजूला पडायची. आता ग्वाला आणि दलित यांच्यासह भाजप यांच्या विरोधात नितीश यांना लढायचे आहे. अर्थात एकेकाळी मोदींचे तोंडही बघणार नाही असे म्हणणारे नितीश नंतर मोदींचे अत्यंत जवळचे मित्र बनले. 2014 लोकसभा निवडणुकांच्या निकालापर्यंत वाजपेयींनी ठरवलेल्या फॉर्म्युल्यानुसार बिहारमध्ये संजद आणि नितीशकुमार हे मोठा भाऊ होते. 2016 मध्ये मोठा भाऊ कोण यावरून वाद सुरू झाला. 2019 ला बरोबरीचे भागीदार म्हटले गेले आणि आता भाजप कार्यकर्ते स्वतःला जुळा भाऊ म्हणत आहेत. संयुक्त जनता दल अजूनही गप्प आहे. आज ते भाजप बरोबर झोके घेत असले तरी निवडणुकीनंतर कशी पलटी मारतील सांगता येत नाही. याच पंचवार्षिकात उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवला एकटे सोडून नितीशकुमार यांनी भाजपबरोबर सत्ता वाटून घेतली होती! चौथ्यांदा मुख्यमंत्री व्हायचे तर मौन राहून स्वार्थ साधला पाहिजे ही त्यांची रणनीती निकाल लागेपर्यंत तरी टिकते की आणखी काही कसरत तेही करून दाखवतात हे लवकरच दिसेल. तसेही बिहारच्या एका राजकीय नेत्याच्या हत्येप्रकरणी लालू यांच्या दोन पुत्रांवर आणि प्रमुख नेत्यांवर खुनाचा गुन्हा सोमवारीच दाखल करून त्यांनीही मैदानात असल्याचे दाखवून दिले आहे. बिहारच्या प्रयोगशाळेने नेहमीच लोकशाहीला थक्क केले आहे. 12 कोटी जनतेच्या विकासाच्या नावाखाली चालू असणारा हा खेळ अजून किती काळ चालणार आहे माहीत नाही. 2060 सालापर्यंत भारतातील सर्वाधिक युवा लोकसंख्या बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान या बिमारू राज्यात असणार आहे. या राज्यातील दैन्य आणि दुरवस्था याला जातीयवाद, भ्रष्टाचार हीच कारणे असल्याचे सांगत हे सर्व नेते राजे झाले. पण परिस्थिती काही बदलली नाही. बदलले ते फक्त नेत्यांचे मित्र पक्ष. दिसली ती फक्त सर्कस. या सगळय़ाच्या पलीकडे जाऊन देश उभा करायचा तर वरील चार राज्ये सुधारली पाहिजेत. त्यांच्यातील चुकीच्या राज्य कारभारामुळे उर्वरित देशाच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, भौगोलिक, औद्योगिक स्थितीवर परिणाम होत आहे आणि लोकशाहीची प्रयोगशाळा प्रत्येक वेळी एक नवा फालतू प्रयोग देशाला दाखवत आहे.
Previous Articleविनोबांची एक गोष्ट
Next Article आयपीएल सट्टेबाजीचा खेळ सुरूच; चार जणांना अटक
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.