ऑनलाईन टीम / पटना :
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या नऊ नेत्यांनी एनडीएच्या उमेदवारांविरोधातच दंड थोपटल्याने त्यांची सहा वर्षासाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
राजेंद्र सिंग, रामेश्वर चौरसिया, उषा विद्यार्थी, रवींद्र यादव, श्वेता सिंग, इंदू कश्यप, अनिल कुमार, मृणाल शेखर, अजय प्रताप अशी पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या बंडखोर नेत्यांची नावे आहेत. या नेत्यांनी एनडीए उमेदवारांविरोधात अर्ज दाखल केले आहेत. पक्षविरोधी कामाचा ठपका ठेवत बिहार भाजप प्रदेश अध्यक्ष संजय जायसवाल यांनी या नऊ जणांना सहा वर्षासाठी पक्षाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला.
बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी या बंडखोर नेत्यांना यापूर्वी इशारा दिला होता. मात्र, त्यानंतरही त्यांनी एनडीए उमेदवारांविरोधात अर्ज दाखल केले. हे कृत्य पक्षविरोधी आहे. यामुळे एनडीएसोबतच पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे, असे जायसवाल यांनी म्हटले आहे.