वृत्तसंस्था / पाटणा :
बिहार विधानसभेपूर्वी राष्ट्रीय जनता दलाला मोठा झटका बसला आहे. दिग्गज नेते रघुवंश प्रसाद सिंग यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. रघुवंश हे 32 वर्षांपासून पक्षात कार्यरत होते आणि लालूप्रसाद यादव यांच्या अत्यंत जवळच्या नेत्यांपैकी एक मानले जायचे. लालूप्रसादांना चारा घोटाळय़ाप्रकरणी तुरुंगवास झाल्यापासून पक्षाची धुरा तेजस्वी यांच्या हातात आहे. रघुवंश हे तेजस्वी यांच्या काही निर्णयांमुळे आणि रामा सिंग यांना राजदमध्ये प्रवेश देण्याच्या प्रयत्नांमुळे नाराज झाले होते.
रघुवंश प्रसाद (74 वर्षे) सध्या दिल्लीच्या एम्समध्ये अतिदक्षता विभागात दाखल आहेत. ते फुफ्फुसांच्या आजारावर उपचार घेत आहेत. रुग्णालयाच्या बेडवरूनच त्यांनी राजद अध्यक्ष लालू यादवांनी राजीनामा पाठविला आहे. जननायक कर्पूरी ठाकूर यांच्या निधनानंतर 32 वर्षांपर्यंत तुमच्या मागे ठामपणे उभा राहिलो, परंतु आता नाही, पक्ष, नेते, कार्यकर्ते आणि सर्वसामान्यांचे भरपूर प्रेम मिळाले, कृपया मला क्षमा करा असे रघुवंश प्रसाद यांनी राजीनाम्याच्या पत्रात नमूद केले आहे.
रामा सिंग यांना विरोध
तेजस्वी राघोपूर या विधानसभा मतदारसंघातील विजय निश्चित करण्यासाठी वैशालीचे बाहुबली नेते रामा सिंग यांना राजदमध्ये सामील करू पाहत आहेत. याला विरोध दर्शवित रघुवंश प्रसाद यांनी 23 जून रोजी पक्षाच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, परंतु लालूंनी तो मंजूर केला नव्हता. लालूंनी रघुवंश यांची मनधरणी करण्यासाठी तेजस्वी यांनाच दिल्लीत धाडले होते, परंतु त्यांची नाराजी कायम राहिली आहे. रघुवंश आणि रामा सिंग हे दोघेही वैशाली जिल्हय़ातील आहेत. दोघांदरम्यान राजकीय संघर्ष राहिला आहे. लोकसभा निवडणुकीत रघुवंश यांना रामा सिंग यांच्याकडूनच पराभव पत्करावा लागला होता.