संजद 122 तर भाजप 121 जागांवर निवडणूक लढविणार
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारमध्ये सत्तारुढ रालोआकडून जागावाटप घोषित करण्यात आले आहे. संजद यावेळी 122 जागांवर निवडणूक लढविणार आहे. तर भाजपला 121 जागा देण्यात आल्या आहेत. जीतनराम मांझी यांच्या हम पक्षाला संजदकडील 7 जागा देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री आणि संजद अध्यक्ष नितीश कुमार यांनी मंगळवारी दिली आहे. तर भाजप स्वतःच्या वाटय़ाला आलेल्या जागांपैकी काही जागा मुकेश सहनी यांच्या व्हीआयपी पक्षाला देणार आहे.
बिहारच्या जनतेची सेवा करणे हेच आमचे काम आहे. आमच्याबद्दल कोण काय बोलतोय याने फरक पडत नाही. रामविलास पासवान यांचा मी आदर करतो. ते लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. बिहारमध्ये लोकजनशक्ती पक्षाचे केवळ 2 आमदार असतानारामविलास पासवान राज्यसभेत गेले ते संजदच्या मदतीशिवाय पोहोचले का असा सवाल नितीश कुमार यांनी चिराग यांना लक्ष्य करत केला आहे.
बिहारचा विकास हेच लक्ष्य
आमच्या मनात कुठलाच गैरसमज नाही. बिहारला पुढे नेणे हेच आमचे लक्ष्य आहे. राजदच्या शासनकाळात कुठलेच काम झालेले नसल्याचे नितीश यांनी यावेळी म्हटले आहे. भाजप-संजदच्या संयुक्त पत्रकार परिषदेत भाजप प्रदेशाध्यक्ष संजय जायस्वाल यांनी नितीश कुमार हेच राज्यातील रालोआचे नेते असल्याचे सांगितले आहे.
नितीश हेच नेते
नितीश कुमार यांना नेता मानणाराच बिहार रालोआत राहू शकणार आहे. रालोआच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या छायाचित्राचा वापर करणार आहे. गरज भासल्यास निवडणूक आयोगाकडे तक्रार केली जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते सुशील मोदी यांनी म्हटले आहे. यंदा बिहारमध्ये रालोआला तीन-चतुर्थांश बहुमत मिळणार असल्याचा दावा भाजप प्रभारी भूपेंद्र यादव यांनी केला आहे.
राजद लक्ष्य
आमचे सरकार 15 वर्षांपासून काम आहे, तर त्यापूर्वी 15 वर्षे काम करण्याची संधी मिळालेल्या राजदशी आमची तुलना लोक करू शकतात. राजदच्या 15 वर्षांच्या शासनकाळात आर्थिक स्थिती काय होती? कायदा-सुव्यवस्थेची स्थिती काय होती? किती प्रमाणावर हत्या होत होत्या? सामूहिक नरसंहारासारख्या घटना घडत होत्या. किती दंगली झाल्या होत्या हे सर्वांनाच माहित आहे. तर आम्ही कशाप्रकारे काम केले हेही लोक जाणून आहेत असे विधान नितीश यांनी केले आहे.