ऑनलाईन टीम / पटना :
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-जनता दल आणि डाव्या पक्षांच्या आघाडीने आपले घोषणापत्र जाहीर केले आहे. महाआघाडी सत्तेत आली तर केंद्र सरकारचे तिन्ही कृषी कायदे सरकार राज्यात लागू करणार नाही, असे काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी जाहीर केले.
काँग्रेसने राष्ट्रीय जनता दल आणि डाव्या पक्षांसोबत महाआघाडी केली आहे. राजद नेते तेजस्वी यादव हे महाआघाडीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत. आमचे सरकार तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी पहिल्या विधानसभेच्या अधिवेशनात विधेयक मंजूर करेल, असे या घोषणापत्रात म्हटले आहे.
‘प्राण हमारा, संकल्प बदलाव का’ असा आमचा जाहीरनामा आहे. सत्तेवर आल्यास मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत शेतकरीद्रोही तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचे विधेयक मंजूर करणार, गरजू लोकांच्या मदतीसाठी कर्पुरी श्रमसहायता केंद्रे राज्यभर सुरू करणार, तसेच शिक्षण क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करून राज्याच्या अंदाजपत्रकातील 12 टक्के रक्कम शिक्षणावर खर्च करणार. प्राथमिक शाळेत प्रत्येक 30 मुलांमागे एक शिक्षक तर माध्यमिक शाळेत 35 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक नेमणार, 10 लाख तरुणांना नोकऱ्या देणार, असा घोषणा या जाहिरनाम्यातून करण्यात आल्या आहेत.