राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून खुलासा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
बिहार, पश्चिम बंगाल आणि त्रिपुरामध्ये बालविवाहाच्या घटना सर्वाधिक संख्येत आढळून येत आहेत. या राज्यांमधील 40 टक्क्यांपेक्षा अधिक महिलांचा विवाह 18 वर्षांपेक्षा कमी वयातच केला जात आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या (एनएफएचएस) सर्वेक्षणातून हा खुलासा झाला आहे. हे सर्वेक्षण 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पार पडले आहे.
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-5 च्या कालावधीत आंध्रप्रदेश (12.6 टक्के), आसाम (11.7 टक्के) बिहार (11 टक्के), त्रिपुरा (21.9 टक्के), पश्चिम बंगाल (16.4 टक्के) मध्ये 15-19 वयोगटात सर्वाधिक संख्येत महिला एकतर मातृत्व अनुभवत होत्या किंवा गरोदर होत्या.
एनएफएचएस-5 च्या अंतर्गत हे सर्वेक्षण 6.1 लाख घरांमध्ये पार पडले असून यात मुलाखतीच्या माध्यमातून लोकसंख्या, आरोग्य, कुटुंब नियोजन आणि पोषणाशी संबंधित माहिती जमविली जात आहे. सर्वेक्षणात सामील 20 ते 24 वयोगटातील महिलांपैकी बहुतांश जणीचा विवाह 18 वर्षांच्या वयापूर्वीच झाल्याचे प्रमाण बिहारमध्ये 40.8 टक्के, त्रिपुरात 40.1 टक्के आणि पश्चिम बंगालमध्ये 41.6 टक्के राहिले आहे.
18 वर्षे ही विवाहाच्या दृष्टीने महिलांसाठी किमान वयोमर्यादा आहे. आसाममध्ये 20 ते 24 वयोगटातील महिलांपैकी 31.8 टक्के महिलांचा विवाह 18 वर्षांपेक्षा कमी वयातच झाला आहे. आंध्रप्रदेशात अशा महिलांचे प्रमाण 29.3 टक्के, गुजरातमध्ये 21.8 टक्के, कर्नाटकात 21.3 टक्के, महाराष्ट्रात 21.9 टक्के, तेलंगणात 23.5 टक्के राहिले आहे.