@ प्रतिनिधी/ बेळगाव
‘नाक दाबताच, तोंड उघडते’ याची प्रचिती बीएड् प्रवेश घेणाऱया विद्यार्थ्यांना आली आहे. उच्चशिक्षण विभागाने आदेश देऊनही प्रवेश प्रक्रिया नाकारणाऱया आरसीयू कुलगुरुंचे उच्चशिक्षण विभागाकडून कान टोचताच प्रवेश प्रक्रियेला परवानगी देण्यात आली. बीएड्चे विद्यार्थी व प्राचार्यांनी हा प्रश्न लावून धरल्याने अखेर कुलगुरुंना नरमाईची भूमिका घ्यावी लागली.
राणी चन्नम्मा विद्यापीठ आणि वाद हे समीकरण काही नवीन नाही. यापूर्वीही आरसीयू अनेकवेळा वादात सापडली आहे. ज्या विद्यार्थ्यांना लॉकडाऊनच्या काळात बीएडसाठी प्रवेश घेता आला नाही, त्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची संधी राज्याच्या उच्चशिक्षण विभागाने उपलब्ध करून दिली. यामुळे राज्यभरातील रिक्त जागा भरण्यास सुरुवात झाली. परंतु आरसीयूच्या कुलगुरुंनी आडमुठी भूमिका घेत ही प्रवेश प्रक्रिया होणार नाही, असे प्राचार्यांना सांगितले. यामुळे बेळगाव, विजापूर व बागलकोट या तीन जिल्हय़ांमधील 45 बीएड् महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना फटका बसणार होता.
कुलगुरुंच्या या आडमुठय़ा भूमिकेविरोधात प्राचार्यांना थेट उच्च शिक्षणमंत्र्यांकडे लेखी तक्रार करावी लागली होती. हा वाद पेटणार हे लक्षात येताच कुलगुरुंनी शुक्रवारी रात्री एक पत्रक काढत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. ज्यांना रिक्त जागांवर प्रवेश घ्यावयाचा आहे. त्यांनी 14 जुलैपर्यंत प्रवेश घ्यावेत, असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाल्याने विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
‘तरुण भारत’मुळे मिळाला न्याय
आरसीयू कुलगुरुंच्या आडमुठय़ा भूमिकेबद्दल ‘तरुण भारत’मधून 6 जुलै रोजी वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. ‘तरुण भारत’ने हा विषय लावून धरल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी व बीएड् महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी फोन करून ‘तरुण भारत’चे आभार मानले आहेत.