निवृत्तीचे सिंधुदुर्गातील प्रमाण 62 टक्के
सर्वांची स्वेच्छानिवृत्ती
चार ग्राहक सेवा केंद्रे होणार बंद
निरोप समारंभ 1 फेब्रुवारीला सावंतवाडीत
तेजस देसाई / दोडामार्ग:
भारत संचार निगम अर्थात बीएसएनएल खात्याच्या स्वेच्छानिवृत्ती योजनेत सिंधुदुर्ग जिह्यातील एकूण 178 अधिकारी, कर्मचारी यांच्यापैकी जवळपास 111 जण सहभागी झाले आहेत. एकाचवेळी एखाद्या शासकीय विभागातून एवढय़ा मोठय़ा संख्येने सेवानिवृत्त होण्याचा बहुधा हा सिंधुदुर्ग जिल्हय़ातील पहिलाच प्रकार असावा.
ज्यांनी वयाची 50 वर्षे पूर्ण केली, अशांसाठी ही योजना होती. 111 जणांचा सदिच्छा समारंभ सावंतवाडी येथील रवींद्र मंगल कार्यालयात 1 फेब्रुवारीला सकाळी 10 ते पाच या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. या वृत्ताला युनियनने दुजोरा दिला असून सदर स्वेच्छानिवृत्त कर्मचाऱयांच्या या प्रकाराला शासनाचा दबाव असल्याचा आरोप बीएसएनएल एम्पलॉईज युनियनने केला आहे. कोणत्याही खात्यातून वयोमानानुसार सेवानिवृत्त होताना कर्मचारी आनंदित असतो. मात्र, या विभागातील स्थिती ‘कही खुशी कही गम’ सारखी आहे.
178 पैकी 111 जण एकाचवेळी निवृत्त
सिंधुदुर्ग जिह्यात बीएसएनएलची सेवा देण्याचे काम 178 अधिकारी व कर्मचारी करतात. पैकी ग्रुप ए (ऑफिसर), ग्रुप बी (सब ऑफिसर), ग्रुप सी (इतर कर्मचारी) यामधून 111 जणांनी स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय स्वीकारला आहे. ज्यांचे वय 50 वर्षांपेक्षा अधिक आहे, अशांसाठी ही योजना होती. डिसेंबर महिन्यापासून याबाबतची प्रक्रिया सुरू होती. 50 वर्षे वयाच्या पुढे ज्यांनी निवृत्ती घेतली, त्यांचा पुढील पाच वर्षांचा पूर्ण पगार देण्यात येणार आहे.
ग्राहकांची होणार गैरसोय
जिह्यात ओरोस, कुडाळ, वेंगुर्ला, देवगड अशी चार ग्राहकसेवा केंद्र सुरू आहेत. यामध्ये अनुक्रमे एक, दोन, एक व एक असे चार कर्मचारी नियुक्त होते. पैकी चारही जणांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. दोडामार्ग तालुक्यात एक केंद्र होते. येथील कर्मचाऱयांनाही स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आहे. त्यामुळे या जागी पर्यायी कर्मचारी येत नाहीत, तो पर्यंत ग्राहकसेवा केंद्रे बंद झाल्यास ग्राहकांची मोठी गैरसोय होणार आहे.
संघटनेची नाराजी
बीएसएनएल एम्पलॉईज युनियनचे जिल्हासचिव कॉमेड गणेश वाघाटे म्हणाले, कर्मचाऱयांना सेवानिवृत्ती घेण्यास शासनाने भाग पाडले. यामागे खासगीकरण असेल, अशी आपली शंका आहे. बीएसएनएल रेंज किंवा अन्य समस्यांनी ग्राहक अलिकडे हैराण होते. त्याला शासन जबाबदार आहे. साधारण 30 हजार कोटी रुपये स्वेच्छानिवृत्तीसाठी लागणार आहेत. त्यापेक्षा बीएसएनएलने 4 जी सारखी सेवा, लेबर पेमेंट व अन्य सुविधा पुरविल्या असत्या तर इतर कंपन्या आल्याच नसत्या. महत्वाचे म्हणजे स्वेच्छानिवृत्ती घेतली खरी. पण, अनेक कर्मचाऱयांचे सोसायटी, बॅंका, एलआयसी आदींचे हप्ते थकित आहेत. याबाबत संभ्रमच आहे. त्यामुळे जिह्यातील स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱयांच्या पाठिशी येथील खासदार, आमदार, विविध लोकप्रतिनिधींनी राहणे गरजेचे असल्याचे पाताडे यांनी सांगितले.
बीएसएनएलकडून माहिती देण्यास नकार
कर्मचाऱयांची स्वेच्छानिवृत्ती व अधिकारी, कर्मचारी यांचा सदिच्छा समारंभ ठरला. याला कोल्हापूरहून अधिकारीही येणार आहेत. याबाबत बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱयांना विचारले असता आपल्याला तशी माहिती प्रेसला देता येत नाही, असे सांगत ‘नो कॉमेंटस’ असे उत्तर दिले.
बीएसएनएलकडून भूमिका जाहीर करणे आवश्यक
सिंधुदुर्ग जिल्हय़ात बीएसएनएलचे नेटवर्क गावागावात आहे. भ्रमणध्वनीच्या सिमकार्डसह, लॅण्डलाईनची अनेक कनेक्शन आहेत. त्यामुळे कर्मचाऱयांअभावी कार्यालये बंद राहणे ग्राहकांच्या हिताचे नाही. त्यामुळे एकूण प्रकाराबद्दल बीएसएनएल विभागाने आपली भूमिका जाहीर करणे आवश्यक आहे.
एकूण 178 कर्मचाऱयांपैकी 111 निवृत्त
वर्ग स्वेच्छानिवृत्ती
गुप ए 10
गुप बी 30
ग्रुप सी 71