प्रतिनिधी/कोल्हापूर
बीए भाग 2 सेमीस्टर 4 चा पेपर विद्यार्थ्यांना चुकीचा मिळाल्याने सोमवारी विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. सुमारे 1 हजार हून अधिक विद्यार्थ्यांना चुकीचा पेपर मिळाल्याने विद्यार्थ्यांच्यात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान चुक निदर्शनास आल्यानंतर मंगळवारी पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या बी.ए अभ्यासक्रमाच्या भाग 2 सेमीस्टर 4चा मानव्यशास्त्र विषयाचा पेपर सोमवारी दुपारी 2. 30 वाजण्याच्या सुमारास ऑनलाईन पद्धतीने होता. पेपर मिळाल्यानंतर हा पेपर जुना अभ्यासक्रम तसेच अभ्यासक्रमाबाहेरील असल्याचे विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आले. मात्र पेपरची वेळ आणी चुकीचा पेपर यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. यानंतर विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाशी संपर्क साधला. यानंतर ही बाब विद्यापीठाच्या निदर्शनास आली. चुक निदर्शनास आल्यानंतर मंगळवारी या विषयाचा पेपर पुन्हा घेण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. अशी माहिती परिक्षा नियंत्रक गजानन पळसे यांनी दिली.
गुरुवार पर्यंत नोंदणी सुरु
दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना 10 ऑगस्ट पासून सुरु झालेल्या मार्च, एप्रिल उन्हाळी सत्रातील परिक्षा तांत्रिक कारणास्तव देता आल्या नाही आहेत. त्यांनी गुरुवार (9 सप्टेंबर) पर्यंत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.
15 अभ्यासक्रमांचे निकाल जाहिर
सोमवारी विद्यापीठाच्या वतीने 15 अभ्यासक्रमांचे निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहिर करण्यात आले. तर 15 हजार 735 पैकी 15 हजार 118 विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांच्या परिक्षा दिल्या.