नाना परिमळ दूर्वा शेंदूर शमिपत्रे
लाडू मोदक अन्ने परिपूरित पात्रे
ऐसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे
सर्वहि सिद्धी नवनिधि देती क्षणमात्रे
नुकत्याच झालेल्या माघी गणेशोत्सवात ही आरती भटजीबुवा आणि त्यांच्याच मित्रमंडळींच्या अतिशय खणखणीत, सुरेल (हे जरा दुर्मिळ) आवाजात ऐकायला मिळाली आणि मन प्रसन्न होऊन गेले. चिंचवडचे संत श्रीमोरया गोसावी यांनी ही आरती रचून त्यातून आपल्या लाडक्मया गणरायाचे गुणगान मोठय़ा अनन्य श्रद्धेने केले आहे. त्यात गणराया सर्वसिद्धीप्रदायक गणला गेला आहे. पण त्यासाठी आधी पूजन करावे लागते. तेही कसे तर वेगवेगळय़ा प्रकारचे सुगंध, पत्री सिंदूरार्चन आणि त्याला प्रिय असलेल्या लाडू मोदकांनी परिपूर्ण भरलेली पात्रे अर्पण करून! ही झाली सामग्री! पण मग ‘ऐसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे’ हे काय? तर मंत्राविना पूजा पावत नाही! अगदी सगळे काही असले तरीही… मग ते मंत्र कसे हवेत? तर बीजाक्षरमंत्र हवा..मग बीजाक्षर म्हणजे काय आणि त्याचा मंत्राशी काय संबंध? तर बीज म्हणजे बी आणि बी पेरले की त्याचा अख्खा वृक्ष होत जातो त्याचप्रमाणे बीज मंत्र हा असा असतो की म्हणणाऱयांना त्या देवतेला जे सांगायचे आहे ते व त्या देवतेचे जे स्वरूप आहे ते दर्शवणारे बीज! याचाच अर्थ असा की त्या मंत्रावर सातत्यपूर्ण साधनेचे शिंपण झाले की सर्व सिद्धीचा कल्पवृक्ष उगवलाच! पण मग याचा संबंध कशाशी आणि कुठेपर्यंत जातो? ॐ हा संगीताचाही बीजमंत्र समजला जातो. संगीत साधना करताना ओंकाराच्या साधनेला स्वरशुद्धीच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. सलील कुलकर्णी यांनी गायिलेले ‘ओंकार अनादि अनंत’ गाणे म्हणजे संगीताचा बीजमंत्र म्हणजे काय याचे एक सुंदर उदाहरण आणि अनुभवही आहे असे म्हणावे लागेल.
पूज्य कलाकार कै. तुळशीदास बोरकर गुरुजी यांना भेटायला कुणीतरी आले तेव्हा ते नेहमीप्रमाणे रियाजात दंग असलेले दिसले. लक्षपूर्वक ऐकणाऱया व्यक्तीच्या लक्षात आले की ते कोणत्याही रागाला आवाहन करीत नव्हते, रागोद्धार करीत नव्हते तर चक्क ‘सारेगमप’चे मूळ स्वरालंकार घोटत होते. अचंबित झालेल्या तिच्या चेहऱयाकडे पाहत ते उद्गारले, ‘अजून हा रियाज भरपूर व्हायला हवा आहे. आज जास्त वेळ करीन म्हणतो.’ हे मूळबीज आहे. सगळे गाणे इथूनच येते आणि यातच सामावलेले असते. ज्जे ब्बात! ज्ये÷ांचे बोलणे हे असे असते.
सहज बोलणे तरी उपदेश! असेच शिकायला समोर बसलेल्या मुलाला गुरुजींनी विशिष्ट आलापी देऊन ती घोटायला सांगितले होते. त्याप्रमाणे तो तयारी करूनच आला होता. पण सगळे झाल्यावर गुरुजींनी शेरा मारला. ‘गाण्यात नुसते सूर ओतून काय मजा? त्यात जीव ओतायला पाहिजे! मग ते आपोआप सजीव होऊन येते.’ पुढे त्यांनी असे स्पष्टीकरण दिले की हे जे स्वरसमूह दिलेले असतात ते केवळ नमुना म्हणून. त्याचा वापर करून तुम्ही स्वतःचे असे तयार करायचे. आता त्याचा प्रश्न आलाच की ते कसे करावे? तर त्याचे उत्तर होते की श्रुतींकडे लक्ष देऊन त्या रागाचे अचूक स्वर पक्के करावेत आणि ते नक्की बसण्यासाठी आरोह अवरोहाची स्वतंत्र प्रॅक्टिस करावी. त्यावर त्यांनी त्या रागातला एक पलटा घोटायला दिला आणि तो करून आणायला लावला आणि त्या विद्यार्थ्याने हा एकच पलटा झाला, बाकी काहीच सुचत नाही अशी तक्रार केल्यानंतर तोच पलटा घोटणाऱया एकाच्या खोलीबाहेर (गुपचूप) त्याला उभे राहून ऐकायला सांगितले आणि मग त्याला लक्षात आले की बीज मंत्र म्हणजे काय?
पुन्हा एकवार समजावून सांगताना गुरुंनी त्याचे विवरण केले की हा एक पलटा म्हणजे असंख्य स्वरवाक्मयांची जननी आहे. गणित सोडवल्यासारखा तो सोडवत सोडवत न्यावा लागेल. त्यात दडलेली स्वरवाक्मयांची वेलबुट्टीदार महिरपी गुंफण अलगद मोकळी करत न्यावी लागेल. असे मोजके पलटे रागाचे समृद्ध विश्व उभे करतात. यातच विस्ताराचे बीज आहे आणि आरोहावरोहात त्या रागाचे. बीजमंत्राचे सांगीतिक स्वरूप हे असे असावे! एकेका पलटय़ात अनेक स्वरवाक्मये असतात. एकेका स्वरवाक्मयात रागाचे चलन बीजरूपात असते. एकेका चलनात आरोहावरोहाचे बीज असते आणि त्याहीपुढे जाऊन एकेका आरोहावरोहात संपूर्ण रागबीज असते. एकेका रागात अनेक स्वर व त्या प्रत्येक स्वरांच्या अनेक श्रुती असतात. म्हणजे मूळ स्वर हेच संगीतविश्वाचे मंत्ररूप बीज म्हणावे लागेल. या इतक्मयाच स्वरांतून असंख्य राग, अपरिमित प्रकारची गाणी बनतात. ज्यात आनंदाचे बीज असते. ‘जे पिंडी ते ब्रह्मांडी’ हा नियम इथेही लागू पडत असावा. मग या बीजमंत्रातून हवे ते साध्य करण्यासाठी तो नुसता माहीत असून भागते का? तर नक्कीच नाही. मग काय करावे, तर पेरलेल्या बीला सदैव रियाजाच्या पाण्याने शिंपीत राहणे हे करणाऱयांच्या हातात असते. जेव्हा एकेका स्वराला हजारो वेळेला घोटघोटून गिरवून गळय़ात किंवा बोटात बसवले जाते तेव्हा आणि तेव्हाच त्याच्यामध्ये दडलेल्या नादब्रह्माला अंकुर फुटतो आणि एकदा का सृजन पालवायला सुरुवात झाली की मग ‘अवघ्या बाहूंत म्या व्योम कवळिले’ अशी त्या स्वरसाधकाची अवस्था होते. त्या बीजमंत्राचे सतत गायन, सतत चिंतन करून त्यातले ब्रह्म हाकेला ओ देतेच. शेवटी बीज म्हणतात ते कशासाठी असते तर विराटाला चिमटीत धरून दुष्काळातही जतन करून ठेवण्यासाठीच ना? खूप पूर्वीच्या काळातले महान कलाकार पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर आपल्या शिष्यांना ‘संगीताचे झाड फुलवा’ असे सांगायचे असा उल्लेख पुलंच्या लेखनात सापडतो. झाड फुलण्यासाठी मुळात जे बीज आवश्यक असते त्या बीजाची ताकद ओळखूनच तर ते असे म्हणत नसतील? सकल भावभावना स्वरात व्यक्त करणाऱया संगीताचे हे बीजाक्षरमंत्र असणारे सारेगमप आपल्याला खरंच खूप सांगू पहात असतील का?
अपर्णा परांजपे-प्रभु – 8208606579