ऑनलाईन टीम / बीड :
ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्या प्रयत्नातून बीडमध्ये उभ्या केलेल्या सह्याद्री देवराईला भीषण आग लागली होती. दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले. मात्र, या आगीत दोन एकरांवरील झाडे जळून खाक झाली आहेत.
या घटनेबाबत बोलताना सयाजी शिंदे म्हणाले, पाच वर्षांपूर्वी बीडमध्ये आम्ही सह्याद्री देवराईची जोपासना केली. आज ही देवराई एक पर्यटन पेंद्र बनत चालले आहे. जगातील पहिलं वृक्ष संमेलनही याच देवराईत झाले होते. शनिवार-रविवारी या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते. मात्र, काही लोकांकडून झाडांना आग लावली जाते, ही विकृती आहे. गेल्या चार वर्षांपासून आम्ही या झाडांची काळजी घेत आहोत. झाडांच्या सुरक्षेसाठी आम्ही इथं कुंपणही घातलं आहे. इथं झाडांचं रोपण करणं अवघड असून वेगवेगळय़ा प्रकारची झाडं आम्ही इथं आणून ती रुजवली.
या देवराईतील जवळपास 500 झाडं जळून खाक झाली आहेत. त्यामध्ये वड, पिंपळ आणि वडाच्या झाडांच्या समावेश होता. बीडमध्ये 35 टक्के झाडांचं प्रमाण असणं गरजेचं असताना तिथं केवळ दोनच टक्के झाडं आहेत. म्हणून आम्ही तिथं देवराई रुजवली. पण विकृतांनी या झाडांना आग लावली. या घटनेची वन विभाग, पोलीस आणि स्थानिकांनी चौकशी करायला हवी.