कसबा बीड /प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील बीड शेड येथे आज मोदी सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे धोरण घेतल्यामुळे अखिल भारतीय किसान संघर्ष समितीतर्फे रास्ता रोको केल्याचे महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस नामदेव गावडे यांनी सांगितले. आज देशामध्ये सर्व ठिकाणी शेतकऱ्यांचा मोदी सरकारला असणारा विरोध तीव्र केला आहे. काही शेतकरी ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन थेट दिल्लीमध्ये जाणार असल्याने सरकारने हे होणारे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला आहे. आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पंचगंगा नदी पुणे बेंगलोर हायवे, हळदी, मुदाळतिट्टा, सांगरूळ फाटा, बीड शेड व मलकापूर या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आले आहे. या आंदोलनावेळी पश्चिम भागातील ज्येष्ठ नेते व गोकुळ संघाचे माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील, वीर्शैव बँकेचे अध्यक्ष अनिल सोलापुरे, किसान संघटनेचे बाबा ढेरे, शिवाजी पाटील (आरळे),संभाजी सुर्वे (चाफोडी), मधुकर मांगोरे (कोगे), जयवंत जोगडे, विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका व मदतनीस, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी शेतकरी वर्ग यांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.