कुटुंबातील व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाल्यास 1 लाख रुपये : मुख्यमंत्री येडियुराप्पा यांची घोषणा
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात कोरोना संसर्गामुळे बीपीएल रेशनकार्डधारक कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अशा कुटुंबाला 1 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी केली आहे. राज्यात कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. अनेक कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यामुळे ही कुटुंबे आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे अशा कुटुंबाला 1 लाखाची मदत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे येडियुराप्पा यांनी सांगितले आहे.
बीपीएल रेशनकार्ड असणाऱया कुटुंबातील प्रौढ व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अशा कुटुंबाला आर्थिक मदत दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सोमवारी बेंगळूरमधील गृहकार्यालय ‘कृष्णा’ येथील पत्रकार परिषदेत सांगितले. कोरोनामुळे बीपीएल रेशनकार्डधारक कुटुंबातील एकापेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला तरी 1 लाख रुपये मदत दिली जाईल. या मदतीसाठी सरकारला 250 ते 300 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार सोसावा लागणार आहे. राज्यभरात बीपीएल कुटुंबातील 25 हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे, अशी माहिती येडियुराप्पा यांनी दिली.
कोरोनामुळे आई-वडील आणि पालक गमावलेल्या अनाथ मुलांना शाळा सेवा योजनेची घोषणा सरकारने केली आहे. अशा मुलांचा शैक्षणिक खर्च सरकारकडून केला जाणार आहे. तसेच उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्जाची सुविधाही दिली जाणार आहे. आता कोरोनाने बीपीएल रेशनकार्डधारक कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या कुटुंबाला 1 लाखाची आर्थिक मदत केली जाणार आहे. राज्य सरकार कोरोना परिस्थितीतही गरिबांच्या पाठिशी आहे, असे ते म्हणाले. यासंबंधी स्वतंत्रपणे मार्गसूची सरकारकडून जारी होणार आहे.
लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटग्रस्त झालेल्या श्रमिक आणि गरिबांसाठी सरकारने 1,750 कोटी रुपयांचे पॅकेज घोषित केले आहे. विविध समाजघटकांना याचा लाभ होत असून लवकरच सर्व लाभार्थींपर्यंत मदत पोहोचणार आहे.
दूध भेसळीची सीआयडी चौकशी
मंडय़ा दूध संघटनेमध्ये दुधात पाण्याची भेसळ करून विक्री झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी दिली. दूध भेसळप्रकरणी अलिकडेच पाच अधिकाऱयांना निलंबित करण्यात आले आहे. तर मंडय़ा दूध संघटनेच्या व्यवस्थापकीय संचालकांची बदली करण्यात आली आहे. यासंबंधी सहकार खात्याकडूनही चौकशी करण्यात आली आहे. आता या प्रकरणाचा सीआयडीमार्फत तपास होणार आहे, असे ते म्हणाले.