वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2020-21 च्या राष्ट्रीय क्रिकेट हंगामावेळी कोरोना महामारी समस्या निर्माण झाली होती. कोरोनाचा विपरित परिणाम राष्ट्रीय क्रिकेटपटूंवर झाल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले होते. दरम्यान भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने सोमवारी क्रिकेटपटूंसाठी नुकसान भरपाई म्हणून सामना मानधनामध्ये जादा 50 टक्के वाढ केली आहे.
कोरोना समस्येमुळे गेल्यावर्षी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे राष्ट्रीय क्रिकेटपटूंना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागले होते. मंडळाच्या नुकसान भरपाई पॅकेजसाठी या क्रिकेटपटूंना बराच कालावधी थांबावे लागले. 2019-20 राष्ट्रीय क्रिकेट हंगामात सहभागी झालेल्या क्रिकेटपटूंना आता त्यांना मिळणाऱया सामना मानधन रक्कमेमध्ये नुकसान भरपाई म्हणून भारतीय क्रिकेट नियंत्रण क्रिकेट मंडळातर्फे दिली जाणार आहे. तसेच आगामी क्रिकेट हंगामासाठी क्रिकेपटूंच्या मानधनामध्ये वाढ करण्याची घोषणा करण्यात आली असल्याची माहिती मंडळाचे सरचिटणीस जय शहा यांनी दिली. सोमवारी मंडळाच्या झालेल्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये राष्ट्रीय क्रिकेटपटूंना नुकसान भरपाई आणि सामना मानधनामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
रणजी क्रिकेट स्पर्धेत खेळणाऱया आघाडीच्या क्रिकेटपटूंना प्रत्येक दिवशी आता जवळपास 60 हजार रूपये मानधन मिळणार आहे. पूर्वी ही रक्कम जवळपास 30 हजार रूपये होती. किमान 40 सामने खेळणाऱया क्रिकेटपटूंला याचा लाभ मिळणार आहे. आता अशा क्रिकेटपटूंना प्रथमश्रैणी सामन्यात 2.40 लाख रूपयांचे मानधन निश्चित झाले आहे. जे क्रिकेपटू 21 ते 40 दरम्यान सामने खेळतात त्यांना प्रत्येक दिवशी 50 हजार रूपये सामना मानधन मिळणार आहे. काही क्रिकेटपटूंना अनुभव कमी असेल त्यांना प्रत्येक दिवशी 40 हजार रूपयांचे मानधन बीसीसीआयकडून मिळणार आहे.
भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाच्या या निर्णयाचा लाभ 16 वर्षांखालील वयोगटापासून ते वरिष्ठ गटापर्यंत सुमारे 2000 क्रिकेटपटूंना होणार आहे. 23 वर्षांखालील तसेच 19 वर्षांखालील वयोगटातील क्रिकेटपटूंना प्रत्येक दिवशी अनुक्रमे 25 हजार आणि 20 हजार रूपयांचे मानधन मिळणार आहे. रणजी स्पर्धेतील सामन्यात खेळणाऱया पहिल्या अकरा क्रिकेटपटूंना प्रत्येकी 35 हजार रूपयांचे मानधन प्रत्येक दिवसांसाठी दिले जाणार आहे. सय्यद मुश्ताक अली करंडक क्रिकेट स्पर्धेत प्रत्येक सामन्यांसाठी क्रिकेपटूंना 17500 रूपयांचे मानधन दिले जाईल. महिला क्रिकेटपटूंच्या मानधनामध्येही बीसीसीआयने वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला. महिला विभागातील वरिष्ठ क्रिकेटपटूंना आता प्रत्येक सामन्यासाठी 12500 ऐवजी 20 हजार रूपयांचे मानधन दिले जाणार आहे. मंडळाच्या या बैठकीला माजी कर्णधार अझरूद्दीन, युधवीर सिंग, संतोष मेनन, जयदेव शाह, अविशेक दालमिया, रोहन जेटली आणि देवजीत साकिया उपस्थित होते.