ईसीबीचे स्पष्टीकरण, कसोटी मालिकेच्या रुपरेषेत बदल करण्याबद्दल ब्रिटीश माध्यमांचे दावे फेटाळले
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
स्थगित केले गेलेल्या आयपीएलचे उर्वरित सामने पूर्ण करण्यासाठी भारतीय क्रिकेट मंडळाचे प्रयत्न सुरु आहेत, असे वृत्त ब्रिटीश प्रसारमाध्यमांनी प्रसारित केले होते. इंग्लिश क्रिकेट मंडळाने मात्र बीसीसीआयने अशी कोणतीही विनंती केली नसल्याचे स्पष्टीकरण शुक्रवारी दिले.
पूर्वनियोजित रुपरेषेनुसार, भारत-इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांची कसोटी मालिका दि. 4 ऑगस्टपासून खेळवली जाणार आहे. ही मालिका एक आठवडा लवकर घेतली तर आयपीएलचा उर्वरित टप्पा पूर्ण खेळवला जाऊ शकतो आणि यासाठी बीसीसीआय ईसीबीशी संपर्क साधण्याची शक्यता आहे, असे वृत्त यापूर्वी ब्रिटीश प्रसारमाध्यमांनी दिले होते. कोरोनाच्या संकटामुळे स्थगित केले गेलेल्या आयपीएल स्पर्धेत अद्याप 31 सामने होणे बाकी आहेत. 2021 ची ही आयपीएल आवृत्ती पूर्ण होऊ शकली नाही तर बीसीसीआयला 2500 कोटी रुपयांच्या उत्पन्नाला मुकावे लागू शकते, असा होरा आहे.
‘बीसीसीआयशी आमचा सातत्याने संपर्क आहे. कोव्हिड-19 मुळे समोर असलेल्या आव्हानांचा बीमोड करण्यासाठी आम्ही अधिक संपर्कात आहोत. मात्र, यादरम्यान वेळापत्रकात बदल करण्याची कोणतीही विनंती बीसीसीआयने केलेली नाही’, असे ईसीबीच्या प्रवक्त्याने वृत्तसंस्थेशी बोलताना नमूद केले.
माजी इंग्लिश कर्णधार व क्रिकेट स्तंभलेखक मायकल आर्थरटनने ‘द टाईम्स’मध्ये लिहिलेल्या स्तंभात बीसीसीआयने ईसीबीशी संपर्क साधत हंगामातील शेवटचा सामना हलवणे शक्य आहे का, याची चाचपणी केली असल्याचा दावा केला. त्यानंतर या चर्चेला सुरुवात झाली. असा बदल केला गेला तर आयपीएलचे उर्वरित सामने इंग्लंडमध्येच आयोजित करण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न असल्याचा आर्थरटनचा यात अप्रत्यक्ष दावा होता. मात्र, आता ईसीबीनेच ही बाब फेटाळून लावली आहे.
शेवटच्या कसोटीसाठी तिकीटविक्री सुरु
सध्याच्या रुपरेषेनुसार, भारत-इंग्लंड यांच्या कसोटी मालिकेतील शेवटची लढत ओल्ड ट्रफोर्डवर दि. 10 सप्टेंबरपासून खेळवली जाणार आहे. या लढतीला मोठय़ा संख्येने प्रेक्षक स्टेडियमवर येण्याची शक्यता आहे. शिवाय, लँकेशायर कौंटी क्लबने या सामन्याच्या तिकीटविक्रीला एव्हाना सुरुवात देखील केली आहे. अर्थात, भारताने ही कसोटी रुपरेषेतून हलवण्याची विनंती केली व ती मान्य केली तर यासाठी ईसीबीला द हंड्रेड हा त्यांचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट व पाकिस्तानविरुद्ध मर्यादित षटकांची क्रिकेट मालिका यातही काही फेरफार करावे लागतील, अशी शक्यता आहे. द हंड्रेड ही इंग्लंडमधील नव्या प्रकारची क्रिकेट स्पर्धा असून नावाप्रमाणेच प्रतिस्पर्धी संघ यातील सामन्यात प्रत्येकी 100 चेंडू (16.4 षटके) खेळतील.
पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱयात 3 वनडे व तितकेच टी-20 सामने खेळणार आहे. ही मालिका दि. 8 ते 20 जुलै या कालावधीत होईल तर ‘द हंड्रेड’ ही स्पर्धा दि. 23 जुलै ते 22 ऑगस्ट या कालावधीत खेळवली जाणार आहे. अर्थात, बीसीसीआयला ईसीबीचे मन वळवण्यात यश आलेच तर ईसीबी या बदल्यात भारतीय क्रिकेटपटूंना द हंड्रेड स्पर्धेत खेळण्यास सांगतील की उर्वरित आयपीएलचा टप्पा इंग्लंडमध्ये पूर्ण करण्याची संमती देतील, हे पाहणे रंजक असणार आहे.