काय आहेत आयपीएल स्पर्धेच्या अपयशाची कारणे?
@ यंदाची आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यावरुन भारतीय क्रिकेट नियामक मंडळांच्या पदाधिकाऱयांतच मुळात अनेक मतभेद होते. मंगळवारी सकाळी झालेल्या ऑनलाईन बैठकीत बीसीसीआयच्या काही पदाधिकाऱयांचे मत असे होते की, ही स्पर्धा एका आठवडय़ाच्या सक्तीच्या ब्रेकनंतर पुन्हा सुरु करावी. पण, मंडळाचे सचिव जय शाह अनिश्चित कालावधीकरिता ही स्पर्धा स्थगित करण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले. अर्थात, प्रतिकूल परिस्थितीत देखील ही स्पर्धा भारतात आयोजित करण्याच्या दुराग्रहामुळे आयोजकांची स्थिती आता ‘तेलही गेले आणि तूपही गेले’, अशी झाली आहे. या अपयशाची कारणे काय आणि मंडळासमोरील नवी आव्हाने कोणती, याचा हा लेखाजोखा!
ही आहेत भारतातील आयपीएलच्या अपयशाची कारणे…
बायो-बबलचे प्रोटोकॉल्स पाळले नाहीत, हे यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या अपयशाचे सर्वात मुख्य कारण. यंदा प्रेक्षकांना स्टेडियममध्ये थेट प्रवेश नव्हता. पण, स्टेडियमवर कार्यरत असलेल्या चौथ्या श्रेणीतील कर्मचाऱयांचा बायो-बबलमध्ये समावेशच नव्हता, अशी बाब उघडकीस आली आहे. बायो-बबलमध्ये समाविष्ट नसल्याने या कर्मचाऱयांची एकही चाचणी झाली नाही आणि तरीही त्यांचा स्टेडियममध्ये राजरोस वावर होता. बायो-बबलमध्येही कोरोनाचा उद्रेक झाला, त्यामागे हे सर्वात महत्त्वाचे कारण असल्याचे प्रथमदर्शनी संकेत आहेत.
बायो-बबल प्रणालीचा नेमका अर्थ काय?
बायो-बबल ही अशी जैव-सुरक्षित प्रणाली आहे, ज्यात केवळ कोरोना निगेटिव्ह व्यक्तीलाच समाविष्ट करुन घेतले जाते. खेळाडू, पंच, स्टेडियममधील ग्राऊंड्समन, अन्य कर्मचारी या सर्वांची कोरोना टेस्ट करुन त्यांचा अहवाल निगेटिव्ह असेल तरच त्यांना यात स्थान दिले जाते. याशिवाय, या सर्व खेळाडू व पदाधिकाऱयांची दर 3 ते 6 दिवसांनी किमान एक चाचणी निश्चितपणाने घेतली जाते. यातील कोणा खेळाडू वा पदाधिकाऱयाचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर त्यांना या ‘बायो-बबल’मधून आयसोलेट केले जाण्याची प्रथा आहे.
युएईमधील आयपीएल का यशस्वी झाले?
संयुक्त अरब अमिरातीत (युएई) मागील वर्षी आयपीएल स्पर्धा आयोजित केली गेली, त्यावेळी अतिशय कडक बायो-बबल अमलात आणले गेले होते. वास्तविक, त्यावेळी देखील स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच चेन्नई सुपरकिंग्सच्या पथकातील 13 सदस्य कोरोनाबाधित असल्याचे आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पण, त्यानंतर आयोजकांनी तातडीने यावर कार्यवाही केली, सारा परिसर सॅनिटाईज केला आणि स्पर्धा पूर्ण होईतोवर यत्किंचीतही कसर राहणार नाही, याकडे जातीने लक्ष पुरवले. त्याचमुळे युएईमधील मागील आवृत्तीची आयपीएल स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली. मुंबई इंडियन्सने त्या आवृत्तीत जेतेपदावर आपली मोहोर उमटवली होती.
आयपीएल कार्यकारिणीची सूचना का धुडकावून लावली?
वास्तविक, आयपीएल कार्यकारिणीने गतवर्षीप्रमाणे यंदाही आयपीएल स्पर्धा संयुक्त अरब अमिरातमध्येच भरवावी, असे स्पष्टपणे बजावून सांगितले होते. पण, बीसीसीआयने ती सूचना सपशेल धुडकावून लावली होती आणि असे करण्यामागे त्यांचे दोन उद्देश होते. यातील पहिला उद्देश असा की, स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीत घेण्याऐवजी भारतात घेऊन अमिरातीत होणाऱया जादा खर्चाला कात्री लावायची आणि दुसरा उद्देश म्हणजे, भारतात आयपीएल स्पर्धा यशस्वी झाली असती तर यामुळे यंदाचा आयसीसी टी-20 वर्ल्डकप आयोजित करण्यासाठी भारताचे दरवाजे देखील सताड उघडले गेले असते. पण, यात आयपीएल स्पर्धाच गुंडाळावी लागल्याने बीसीसीआयच्या दुसऱया उद्देशाला देखील हरताळ फासला जाणार, हे निश्चित आहे. पूर्वनियोजित रुपरेषेनुसार, आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये भारतात होणे अपेक्षित आहे.
8 प्रँचायझींचे आयपीएल झेपले नाही. 16 संघांचा वर्ल्डकप कसा झेपणार?
गतवर्षी संयुक्त अरब अमिरातीत आयोजित आयपीएल स्पर्धा काही अडथळे पार केल्यानंतर यशस्वीरित्या संपन्न झाल्याने यंदाही क्रिकेट चाहत्यांना आयपीएल आयोजकांपासून बऱयाच अपेक्षा होत्या. पण, चारच आठवडय़ांमध्ये यंदाच्या आयपीएलला आपला गाशा गुंडाळावा लागला असून याचे अनेक फटके आयोजकांना सोसावे लागतील, हे स्पष्ट आहे. यंदाची आयपीएल स्थगित करावी लागल्यानंतर ऑक्टोबरमधील आयसीसी टी-20 विश्वचषक कसा भरवणार, हा कळीचा प्रश्न या निमित्ताने उभा ठाकला आहे. 8 प्रँचायझींचे आयपीएल स्पर्धा यशस्वी करण्याचे शिवधनुष्य पेलवले नाही, अशा परिस्थितीत 16 देशांचे संघ सहभागी होत असलेल्या विश्वचषकाचे आयोजन कसे करणार, याचे उत्तर देणे आता मंडळासाठीही कठीण असणार आहे. याचमुळे कदाचित त्यांनी हा वर्ल्डकप युएईमध्ये हलवण्याची तयारी मनाने सुरु केली आहे.
लसीकरणात भारत नेमका कुठे?
एकूण झालेल्या लसीकरणाच्या निकषावर भारताला अद्याप मोठा पल्ला गाठणे बाकी आहे. सध्या भारतात पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 12 टक्के तर दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण अवघे 2 टक्के इतके आहे. विकसित देशांच्या निकषावर अमेरिकेत आतापर्यंत थोडेथोडके नव्हे तर 40 टक्के दुहेरी लसीकरण पूर्ण झालेले आहे. आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱया देशांसाठी भारतातील मंदगतीने सुरु असलेल्या लसीकरणाची बाब यासाठी महत्त्वाची आहे की, अशीच परिस्थिती यापुढेही कायम राहिली तर सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत येथील कोरोनाचे रुद्र स्वरुप आटोक्यात येणे कष्टप्रद ठरु शकते आणि अशा परिस्थितीत कोणताही देश या स्पर्धेसाठी आपला संघ पाठवण्याची सुतराम शक्यता नसेल.
पॅट कमिन्सच्या ‘त्या’ यू-टर्नचे कारण काय?
यंदा आयपीएल स्पर्धेत केकेआर प्रँचायजीकडून खेळलेल्या ऑस्ट्रेलियन जलद गोलंदाज पॅट कमिन्सने भारतातील पंतप्रधान साहायता निधीकरिता (पीएम केअर फंड) आपण 37 लाख रुपये सुपूर्द करणार असल्याची घोषणा केली आणि याचे भारतीय क्रिकेट वर्तुळातून जोरदार स्वागतही झाले होते. पण, नंतर काहीच दिवसात पॅट कमिन्सने यू-टर्न घेतला आणि पीएम केअर फंडऐवजी आपण भारतातील कोव्हिड-19 उद्रेकावर नियंत्रणासाठी कार्यरत असलेल्या ऑस्ट्रेलियन युनिसेफकडे हा निधी सुपूर्द करणार असल्याचे ट्वीट केले.
भारतात सध्या पीएम फंड व पीएम केअर फंड कार्यान्वित आहेत. यापैकी, पीएम केअर फंड हे माहितीच्या अधिकाराखाली येत नाही. त्यामुळे, त्यातील निधीचा विनियोग कसा होतो, याची माहिती मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
उर्वरित आयपीएलचा टप्पा पूर्ण होणार का?
तूर्तास, आता स्पर्धा स्थगित करत उर्वरित टप्पा कालांतराने खेळवू, अशी घोषणा आयपीएल कार्यकारिणीने केली आहे आणि साधारणपणे सप्टेंबरच्या आसपास उर्वरित सामने घेण्याचा त्यांचा मानस आहे. पण, या स्पर्धेत जवळपास 30 टक्के विदेशी खेळाडू समाविष्ट आहेत आणि ते उर्वरित टप्प्यासाठी त्यावेळी वेळ देऊ शकणार का, हा आयोजनात अडसर आणू शकणारा मुद्दा आहे. सध्याच्या रुपरेषेनुसार जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत एकूण 5 आंतरराष्ट्रीय मालिका सुरु असणार आहेत. सप्टेंबरमध्ये तर भारतीय संघच इंग्लंडच्या दौऱयावर जाणार आहे. त्यामुळे, विदेशी खेळाडू उर्वरित टप्प्यासाठी कसा वेळ देऊ शकणार, याचे उत्तर तूर्तास आयपीएल कार्यकारिणीकडे देखील नाही, अशी परिस्थिती आहे. -विवेक कुलकर्णी