सरकार असंवेदनशील असल्याचा सुबोध महाले यांचा आरोप, पेडणेत महामार्गावर ठिकठिकाणी खड्डेच खड्डे
प्रतिनिधी / पेडणे
पेडणे तालुक्मयातील राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे कंत्राटदाराने चतुर्थीच्या आधी दोन दिवस बुजवण्याचा प्रयत्न केला. हे खड्डे बुजवताना मात्र सार्वजनिक बांधकाम राष्ट्रीय महामार्गाचे कोणीच अभियंते, अधिकारी, पर्यवेक्षक उपस्थित नव्हते. पडलेल्या खड्डय़ात माती घालून बुजवून जनतेच्या डोळय़ाला पाने पुसण्याचे काम कंत्राटदाराने केले. मात्र चतुर्थीच्या दिवशी हे खड्डे आपल्या पूर्व स्वरुपात आले. सरकार असंवेदनशील असून जनतेकडून वाहनाचा कर घेऊन थट्टा करत असल्याची प्रतिक्रिया उगवे तांबेसे मोप पंचायतीचे उपसरपंच सुबोध महाले यांनी दिली.
संवेदना नसलेले सार्वजनिक बांधकाम खाते.
या रस्त्याकडे पाहिले तर राष्ट्रीय महामार्गाचे काम पाहणारे सार्वजनिक बांधकाम रस्ता विभाग हा संवेदना नसलेला विभाग म्हणून गणला जात आहे. सरकार अस्तित्वात आहे कि नाही असा संशय या रस्त्याकडे पाहिल्यावर येतो. कंत्राटदाराचे सरकार चोचले पुरवल्याने देशातील सर्वात निकृष्ट दर्जाचा हा रस्ता आणि त्याचे काम आहे. या भागातून निवडून आलेले आमदार मंत्री आणि खासदार सुद्धा काहीच बोलत नसल्याने या रस्त्याची स्थिती भयंकर झालेली आहे.
पेडणेकरांनी निवडून दिलेला आमदार हा मडगावला राहतो त्यामुळे त्याला या रस्त्याची स्थिती काय आहे याची कल्पना नाही. चुकीच्या आमदाराला निवडून दिल्यामुळे या रस्त्याची हि स्थिती झालेली आहे असे मत उगवे -तांबोसे – मोप पंचायतीचे उपसरपंच सुबोध महाले यांनी व्यक्त केले. चतुर्थीच्या काळात खड्डय़ातूनच गणेश भक्तांनी मुर्त्या आणल्या आणि दीड दिवसात तश्याच खड्डय़ातून धक्के देत पोचवल्यात. निदान पाच दिवसाचे गणपती तरी व्यवस्थित विसर्जन करण्यासाठी खड्डे बुजवण्यासाठी सुबुद्धी सरकारला द्यावी अशी मागणी सुबोध महाले यांनी केली.
रस्ता विभाग झोपी गेला : उदय महाले
उदय महाले यांनी प्रतिक्रिया देताना रस्त्याची झालेली चाळण म्हणजे सरकारचे झालेले दुर्लक्ष. रस्त्याची स्थिती पहिली असता सार्वजनिक बांधकाम विभाग कसा झोपला हे दिसून येते. या रस्त्याची वाताहत झाली, त्यामुळे वाहने चालवताना नागरिकाना जीव मुठीत घेवून ये जा करावे लागते. याचे परिणाम येत्या निवडणुकीत सरकारला भोगावे लागतील असा इशारा उदय महाले यांनी दिला.
शशिकांत महाले यांनी प्रतिक्रिया देताना रस्ता हा अत्यंत वाहन चालवण्यास धोकादायक बनला आहे, राष्ट्रीय महामार्ग रस्ता विभागाने या कडे लक्ष देवून हे खड्डे आता तरी बुजवावेत अशी मागणी केली.
आंदोलनाचा परिणाम नाही
आम आदमी पार्टीने 8 रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेवून रास्ता रोको करण्याचा प्रयत्नात असतानाच खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला होता तेच खड्डे आता पुन्हा एकदा मोठे आकार घेत आहेत. कंत्राटदाराने आंदोलन कर्त्यांच्या डोळय़ाला पाने पुसण्याचा प्रयत्न केला आहे.
सध्या रस्त्याची स्थिती भयानक झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग 66 याला जसे खड्डे पडले त्याच पद्धतीने अंतर्गत रस्त्यानाही मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत, न्हयबाग पोरस्कडे या पुला खाली अंतर्गत मुख्य रस्त्याला मोठय़ा प्रमाणात खड्डे पडलेले आहे या रस्त्याकडेही सार्वजनिक बांधकाम रस्ता विभागाचे दुर्लक्ष झालेले आहे.