कोणताही फॉर्म्यूला मान्य नाही, पिकाऊ जमीन मुळीच देणार नाही
प्रतिनिधी/ बेळगाव
अनगोळ येथे बुडाच्यावतीने स्कीम नंबर 62 लागू करण्यासाठी अनगोळ गावातील शेतकरी बांधवांना नोटीस बजाविण्यात आली आहे. यामुळे संतापाची लाट उसळली आहे. बुडाच्यावतीने या महिन्याच्या 10 तारखेला शेतकऱयांना जमीन संपादित करण्यासाठी नोटीस धाडण्यात आली आहे. तसेच 23 तारखेच्या आत या नोटिशींना उत्तर देण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. सदर नोटिसमध्ये 50/50 हा फॉर्म्यूला जाहीर करण्यात आला आहे. मात्र याला येथील शेतकऱयांचा विरोध होत आहे. यासंदर्भात अनगोळ परिसरातील शेतकऱयांची बैठक रविवारी झाली. बुडाला एक इंचही जमीन न देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
अनगोळ तसेच बेळगाव शहर परिसरातील आसपासच्या शेतजमिनीवर बुडाच्यावतीने विविध स्कीम्स राबविण्यासाठी भू-संपादन करण्याचा घाट घातला जात आहे. त्याचप्रमाणे कणबर्गीनंतर आता अनगोळ येथील शेतकऱयांना बुडाच्यावतीने नोटीस धाडण्यात आली आहे. त्यामुळे येथील शेतकरी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत आहेत. 2012 साली असाच प्रयत्न बुडाच्यावतीने करण्यात आला होता. पण तेव्हा शेतकऱयांनी संघटित होऊन भव्य मोर्चा काढण्यात आला होता. आताही तशाच प्रकारे आंदोंलन करण्याचा इशारा शेतकऱयांनी दिला आहे.
बहुतांश शेतकरी अल्पभूधारक
अनगोळ परिसरात गरीब अल्पभूधारक शेतकरी मोठय़ा प्रमाणात आहेत. शेती आणि दूध व्यवसायावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे हातची शेती गेल्यावर त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. बऱयाच शेतकऱयांची शेती ही गुंठय़ांच्या प्रमाणात आहे. ही शेतीही बुडाच्या घशात गेली तर संपूर्ण शेतकरी रस्त्यावर येणार आहे. आधीच या भागातील बरीच शेती महामार्गात गेली आहे. काही ठिकाणी बुडाने आधीच अधिग्रहण केली आहे. त्यामुळे हातात असलेली तुटपुंजी जमीनही गेली तर शेतकरी उघडय़ावर पडणार आहे. म्हणून जमीन बुडाला देण्यास विरोध होत आहे.
तिबार पिकाऊ जमीन
अनगोळ वडगाव, शहापूर, जुने बेळगाव, येळ्ळूर या परिसरातील शिवारात बारा महिने पिके घेतली जातात. पावसाळय़ात भात, हिवाळय़ात कडधान्य तसेच उन्हाळय़ात भाजीपाला लागवड केली जाते. येथे भात, जोंधळा, मसूर, वाटाणा, मोहरी, हरभरा अशी पिके घेण्यात येतात तर उन्हाळय़ात भाजीपालाही पिकविला जातो. त्यामुळे या भागातील शेतकरी हा शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे त्यांनी आपली जमीन देण्यास विरोध दर्शविला आहे.
यावेळी बैठकीला अर्जुन बुद्रुक, गजानन जाधव, कृष्णा बुद्रुक, अशोक होळकर, सोम्माण्णा सोमनाचे, प्रदीप गडकरी, मारुती बुद्रुक, नागेश जाधव, मनोहर बुद्रुक, चेतन बुद्धण्णावर, कृष्णा सोमनाचे, नारायण धाकलुचे, मनोहर सोमनाचे, पिराजी सोमनाचे, मोहन सोमनाचे, निंगाप्पा सोमनाचे, आनंद यल्लमण्णावर, सुधीर भेंडिगेरी, अशोक मुतगेकर आदी बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.