वृत्तसंस्था/ गुवाहाटी
भारतात 28 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान तामिळनाडूमध्ये होणाऱया 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेची क्रीडाज्योत रविवारी गुवाहाटीमध्ये दाखल झाली. आसामचे क्रीडा युवजन खात्याचे मंत्री विमल बोरा यांनी या क्रीडाज्योतीचे स्वागत केले.
आतापर्यंत बुद्धिबळ ऑलिम्पियाड क्रीडाज्योतीने देशातील 75 शहरांचा दौरा केला आहे. भारतामध्ये पहिल्यांदाच बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा भरविली जात आहे. शिलाँगमध्ये रविवारी भारताचा ग्रॅण्डमास्टर मित्रभा गुहाने ही क्रीडाज्योत घेतली. या समारंभावेळी आसामच्या क्रीडाक्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. बुद्धिबळ ऑलिम्पियाड क्रीडाज्योतीने आतापर्यंत लेह, जम्मू, श्रीनगर, धर्मशाला, सिमला, चंदीगड, पतीयाळा, अमृतसर, पानीपत, गुरुग्राम, कुरुक्षेत्र, डेहराडून, हरिद्वार, मीरत, कानपूर, केवाडिया, अहमदाबाद, दांडी, सुरत, जयपूर, दमन, मुंबई, पुणे, नागपूर, पणजी, भोपाळ, इंदोर, ग्वाल्हेर आणि झांशी या शहरांना भेटी दिल्या आहेत. सदर क्रीडाज्योतीचा प्रवास 40 दिवसांचा असून बुद्धिबळ ऑलिम्पियाड कीडाज्योत रॅलीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते.