चार मराठी चित्रपटातून चमकदार कामगिरीः पाचवा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर
संजय गायकवाड / सांगली
चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करण्याची कोणतीही पार्श्वभूमि नसताना आणि सिनेमात कसे काम करायचे याची काहीही माहिती नसताना केवळ शाळेतील वक्तृत्व स्पर्धा आणि छोटय़ा मोठय़ा नाटकात केलेल्या कामामुळे एक दोन नव्हे तर चार चार मराठी चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडणारा बुधगावचा यश कुलकर्णी मराठी चित्रपटातील उगवता तारा म्हणून पुढे येत आहे.
तसे पाहिले तर मायानगरी मुंबईची भुरळ न पडलेला माणूस विरळच म्हणावा लागेल. बॉलीवूडमध्ये नशिब अजमाविण्यासाठी देशाच्या कानाकोपऱयातून दरवर्षी हजारो तरूण तरूणी मुंबईत येतात. त्यातील काही यशस्वी होतात. तर बरेचजण कुठे गायब होतात हे पुन्हा समजतही नाही. मुंबई हे बॉलीवूडप्रमाणेच मराठी चित्रपट, टीव्ही मालिका आणि आता वेब सिरीज निर्मितीचे जगातील एक प्रमुख केंद्र आहे.
मराठी सिनेमा आणि टीव्ही मालिकांमध्ये काम मिळावे. यासाठी हजारो युवक धडपडत असतात. काहींना मिळते तर बऱयाचजणांच्या पदरी निराशा पडते. बुधगांव ता. मिरज येथील यश संजय कुलकर्णी हा मुलगा मात्र या सगळया गोष्टींना अपवाद आहे. तसा यशचा सिनेमाशी काही संबंध नाही. चौथीपर्यंत बुधगावच्या आदर्श शाळेत असताना वक्तृत्व स्पर्धा आणि स्नेहसंमेलनातून केलेल्या छोटय़ा मोठय़ा भूमिका वगळता त्यांने रंगभूमी वा सिनेमामध्ये काम केले नव्हते.
मराठी सिनेमांचे लेखक व दिग्दर्शक असणारे साताऱयाचे नितीन दीक्षित हे यशचे काका. ते ‘अवताराची गोष्ट ’ या सिनेमाची निर्मिती करत होते. लहान मुलांच्या भावविश्वावर आधारलेल्या या सिनेमासाठी कलाकारांचे ऑडीशन सुरू असताना दिक्षीत यांनी यशला काय रे तू चित्रपटात काम करणार का? असा प्रश्न विचारला, त्यावेळी सहावीत असणाऱया यशने पटकन हो म्हणून सांगितले. आणि येथेच यशच्या करिअरला खऱया अर्थाने कलाटणी मिळाली. अवताराची गोष्टमध्ये मंग्या हे सहबालकारांचे पात्र साकारताना यश प्रथमच कॅमेऱयासमोर उभा राहिला. त्याने सहजपणे ही भूमिका पार पाडली. त्यावेळी त्याला कॅमेऱयाची अजिबात भिती वाटली नाही.
यानंतर शिक्षण पूर्ण करत असतानाच त्याला एकापाठोपाठ एक असे चित्रपट मिळत गेले. त्यात राज भोरडे यांच्या ‘घाट ’ या दुसऱया चित्रपटात त्याने मन्या ही मुख्य भूमिका साकारली आहे. त्यापाठोपाठ प्रेमावर आधारीत असलेल्या प्रकाश पवार यांच्या ‘रांजण ’मध्येही त्याने प्रताप ही मुख्य भूमिका साकारली. त्यापाठोपाठ कबड्डी खेळावरील मंगेश कंठाळे यांच्या ‘सुरसपाटा’ या चित्रपटातही दिघ्या हे पात्र उभे केले. चार चित्रपटात काम करताना यशने अभ्यासाकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. शाळेतही तो हुषार आहे. सिटी हायस्कूलमध्ये दहावीला असताना त्याने सूरसपाटा त काम केले. पुढे 12 वीचे महत्वाचे वर्ष असल्याने त्याने कोणताही चित्रपट स्कारला नाही. सध्या तो विलिंग्डन महाविद्यालयात बीएस्सीच्या प्रथम वर्षाचे शिक्षण घेतो आहे. सध्या अक्षय गोरे निर्मित फंटर हा पाचवा सिनेमा प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.
दिग्गज कलाकारांबरोबर काम
यशने चित्रपटाच्या निमित्ताने उपेंद्र लिमये, संजय जाधव, गोविंद नामदेव, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, विद्याधर जोशी, आदिनाथ कोठारे, लिना भागवत, रश्मी अनपट, सुलभा देशपांडे, सुनिल अभ्यंकर, आशिष विद्यार्थी, उमेश जगताप, मिताली जगताप अशा अनेक दिग्गज व ताकदीच्या कलाकारांबरोबर काम केले आहे.
पदार्पणातच अनेक पुरस्कार
यश कुलकर्णी याला आत्तापर्यंत इम्फा ऍवॉर्ड, सहय़ाद्री पुरस्कार, कल्याण फेस्टिवल, झी गौरव ,संस्कृती कलादर्पण पुरस्कार आदी पुरस्कार मिळाले आहेत. सध्या मला शिक्षण पूर्ण करायचे आहे. त्यानंतर मात्र सिनेमामध्ये करिअर करणार आहे, असे ‘तरूण भारत’शी बोलताना त्यांने सांगितले.