प्रतिनिधी / सांगली
राज्य सरकारी,निमसरकारी,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचाऱयांच्या बुधवारी होणाऱया राज्यव्यापी संपात सांगली जिल्हयातील 50 हजारावर कर्मचारी,कामगार सहभागी होणार असल्याची माहिती समन्वय समितीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली. बुधवारी सकाळी 11 वाजता विश्रामबाग चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढून शासनाच्या कामगार,कर्मचारीविरोधी धोरणाचा निषेध करण्यात येणार आहे.
मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जे.के.महाडीक, सरचिटणीस पी.एन.काळे,कॉ.शंकर पुजारी, डी.जी.मुलाणी,रमेश सहस्त्रबुध्दे आदींनी रविवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. देशभरातील महागाईचा उच्चांक, आर्थिक मंदी, बेरोजगारीची समस्या, कामगार आणि कर्मचारी विरोधी शासनाची धोरणे, शासनाने लावलेला कंत्राटीकरणाचा अतिरेकी सपाटा आणि केंद्र सरकारच्या जनता विरोधी धोरणांच्या निषेधार्थ आठ जानेवारी रोजी विविध कामगार आणि कर्मचारी संघटनांनी देशव्यापी संपाची हाक दिली आहे.
राज्यातील सर्व कर्मचाऱयांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी 2005नंतर नियुक्त झालेले कर्मचारी आग्रही आहेत. पण शासन सकारात्मक नाही. गेल्या वर्षीचा महागाई भत्ता अद्याप मिळालेला नाही, अनुकंपा तत्वावरील नोकरभरती ठप्प आहे. पाच दिवसांचा आठवडा आणि सेवानिवृत्तीचे वय साठ करण्याच्या किरकोळ मागणीवरही शासन निर्णय घेत नाही. राज्यातील महिला कर्मचाऱयांना केंद्राने लागू केलेली दोन वर्षाची बाल संगोपन रजा मंजूर करण्यात यावी, इतरही राज्यात व विभागीय स्तरावरील मागण्यांचा विचार होत नसल्याने राज्यातील शिक्षक नाराज आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात शासकीय कर्मचारी आणि कष्टकऱयांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्या नाराजीतून समस्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. जिल्हयातील 20 ते 25 संघटना या संपामध्ये सहभागी होणार असून त्याची जोरदार तयारी करण्यात आली असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
यावेळी एस.एस.सुर्यवंशी, चतुर्थश्रेणी महासंघाचे अध्यक्ष संजय व्हनमाने, गणेश धुमाळ, मिलींद हारगे, संदीप सकट, दयानंद मोरे, एस.वाय पाटील, घर कामगार युनियनच्या सुमन पुजारी, धनंजय जाधव, अनिल इनामदार, यासह पोष्ट कर्मचारी संघटना, महामंडळ, प्राथमिक शिक्षक समिती, बँक कर्मचारी संघटना, बी.एस.एन.एल.आयुर्विमा, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना आदी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
देशातील वीस कोटी शासकीय कर्मचारी आणि कामगार या संपात सहभागी होणार असून जिल्ह्यातील संप यशस्वी करण्यासाठी कामगार,कष्टकरी, आणि शासकीय निमशासकीय कर्मचाऱयांनी मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहनही करण्यात आले आहे.
संपाच्या प्रमुख मागण्या
जुनी पेन्शन योजना लागू करा,केंद्राप्रमाणे सर्व भत्ते राज्य कर्मचाऱयांना लागू करा, सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करा, थकीत महागाई भत्ता तात्काळ द्या,राज्य कर्मचाऱयांचे निवृत्तीचे वय 60 करा, पाच दिवसांचा आठवडा करा, सर्व संवर्गातील रिक्त पदे तातडीने भरा,कंत्राटीकरण बंद करा, उत्कृष्ट कामासाठी आगाऊ वेतनवाढ योजना पुन्हा सुरू करा, आदी मागण्यांसाठी हा संप करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.