आज होणार निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे चित्र स्पष्ट : चिन्हांचे वाटप झाल्यानंतर प्रचाराचा नारळ फुटणार
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिका निवडणुकीसाठी 58 वॉर्डांकरिता 468 अर्ज वैध ठरले आहेत. बुधवारी चार उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. उमेदवारी अर्ज माघारीसाठी गुरुवार दि. 26 पर्यंत मुदत असून निवडणूक रिंगणातील उमेदवार कोण? याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर निवडणूक रिंगणातील उमेदवारांना निवडणूक चिन्ह देण्यात येणार असून आपल्या आवडी-निवडीचे निवडणूक चिन्ह मिळावे, अशी अपेक्षा अपक्ष उमेदवारांना आहे. गुरुवारी सायंकाळपासून प्रचाराचा नारळ फुटणार आहे.
महापालिका निवडणूक होणार की नाही? असा संभ्रम निर्माण झाला होता. निवडणुकीची अधिसूचना जारी होऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसेच उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे निवडणूक रिंगणात कोणता उमेदवार राहणार? याकडे संपूर्ण शहरवासियांचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्जांच्या छाननीवेळी 7 उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत. 468 उमेदवारी अर्ज वैध झाले असून, 44 जणांनी प्रत्येकी दोन अर्ज दाखल केल्याने एकच अर्ज ग्राहय़ धरण्यात आला. त्यामुळे 468 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस उमेदवारी माघारीसाठी वेळ देण्यात आला आहे. बुधवारी वॉर्ड क्र. 14 मधून महेश तळेकर, वॉर्ड क्र. 29 मधून नागेंद्र मोतिचंद पावसकर, वॉर्ड क्र. 39 मधून संतोष यल्लाप्पा काटवा आणि वॉर्ड क्र. 58 मधून विद्या कडकोळ या 4 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे 464 उमेदवारी अर्ज अद्याप शिल्लक आहेत. गुरुवारी दुपारपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. त्यामुळे निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे चित्र गुरुवारी दुपारनंतर स्पष्ट होणार आहे.
यंदा भाजप, काँग्रेस, आम आदमी पार्टी व जेडीएस अशा विविध पक्षांनी चिन्हावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेऊन उमेदवार दिले आहेत. त्यामुळे प्रत्येक वॉर्डमध्ये राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार आहेत. त्याचप्रमाणे अपक्ष उमेदवारांची संख्यादेखील मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे यामध्ये निवडणूक रिंगणात प्रत्येक वॉर्डमधून किती उमेदवार आणि कोण उमेदवार राहणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रीय पक्ष, म. ए. समितीचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवार निवडणूक लढविणार असल्याने बहुरंगी लढत होणार, हे निश्चित आहे. काही मोजक्मया आणि राखीव वॉर्डमध्ये उमेदवारांची संख्या कमी आहे. पण सामान्यांसाठी खुल्या असलेल्या वॉर्डांमध्ये उमेदवारांची भाऊगर्दी झाली आहे.
रात्री जागू लागल्या
उमेदवारांची संख्या जास्त असल्याने काहींनी उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. बैठका तसेच चर्चा सुरू आहेत. काही ठिकाणी गुप्त बैठका घेऊन उमेदवारांना माघार घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रात्री उशिरापर्यंत एकीच्या बैठका सुरू असून, अर्ज माघारी घेण्यासाठी विविध दबावतंत्राचा वापर सुरू आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी तडजोड करण्यात येत आहे. तसेच पाठिंबा मिळविण्यासाठी देखील आटापिटा सुरू आहे. काही अपक्ष उमेदवारांनी माघार घेऊन अन्य उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात किती उमेदवार राहणार? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.