मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांची माहिती : बेंगळुरात पत्रकारांशी संवाद
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात अतिवृष्टीमुळे गुलबर्गा, यादगिरी, रायचूर आणि विजापूर जिल्हय़ांमध्ये झालेल्या नुकसानीची बुधवार दि. 21 रोजी हवाई मार्गाने पाहणी करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी दिली. शिकारीपूरला जाण्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे उत्तर कर्नाटकात मुसळधार पाऊस झाला आहे. याचबरोबर महाराष्ट्रातील जलाशयांमधून भीमा आणि कृष्णा नद्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे गुलबर्गा, यादगिरी, रायचूर आणि विजापूर जिल्हय़ांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून पूरग्रस्तांना मदत पुरविण्याचे कार्य सुरू आहे.
पुरामुळे नुकसान झालेल्या हानीची आपण स्वतः बुधवारी हवाई मार्गाने पाहणी करणार आहे. या जिल्हय़ांमधील अनेक खेडी पाण्याखाली गेली असून मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून तत्काळ उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची वास्तविक मर्यादा शोधण्यासाठी हवाई पाहणी करणे आवश्यक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक महिन्यांपासून शिकारीपूरला जाणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे आता जात असून दोन दिवसानंतर बेंगळूरला परतणार आहे. दि. 21 रोजी पोलीस खात्यासंबंधी कार्यक्रम आहे. त्यानंतर हवाई मार्गाने पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहे, असे येडियुराप्पा सांगितले.