वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतामध्ये क्रिकेट या क्रीडा प्रकाराला अधिक प्रसिद्धी मिळत असल्याचे चित्र पहावयास मिळते. पण टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकपटूंनी मिळविलेल्या यशानंतर आता देशात भाल्यालाही तितकीच अमाप लोकप्रियता मिळेल, असे प्रतिपदान केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांनी केले आहे.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने पहिल्यांदाच भालाफेक या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळविण्याचा पराक्रम केला. त्यानंतर चोप्रा पाठोपाठ आता टोकियोमध्ये सुरू असलेल्या पॅरॉलिम्पिक स्पर्धेत सुमित अंतिल आणि देवेंद्र झाझरिया तसेच सुंदरसिंग गुर्जर यांनी या भालाफेक ऍथलिट्सनी या क्रीडा प्रकारात पदके पटकावत भारताचे नाव अधिकच उज्ज्वल केले. टोकियो पॅरॉलिम्पिक स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी झालेल्या सुमित अंतिलने एफ-64 क्लास गटातील भालाफेक प्रकारात यापूर्वी नोंदविलेला स्वतःचाच विश्वविक्रम मागे टाकत सुवर्णपदकाचा गवसणी घातली. देवेंद्र झाझरिया आणि गुर्जर यांनी या क्रीडा प्रकारात अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदकांची कमाई केली. क्रिकेट बॅटप्रमाणेच आता नजीकच्या काळात भाल्यालाही देशामध्ये अधिक प्रसिद्धी मिळेल, असा विश्वास केंद्रीय क्रीडामंत्री तसेच बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकुर यांनी व्यक्त केला. टोकियो पॅरॉलिम्पिक स्पर्धेत पदके मिळविणाऱया भारतीय स्पर्धकांचा गौरव करण्यासाठी येथे समारंभ आयोजित केला होता. या समारंभाला थाळीफेकमध्ये रौप्यपदक विजेता योगेश कथुनिया, उंचउडीतील कांस्यपदक विजेता शरदकुमार त्याचप्रमाणे भारतीय क्रीडा क्षेत्रातील अन्य मान्यवर उपस्थित होते. टोकियोमध्ये झालेल्या ऑलिम्पिक आणि त्यानंतर पॅरॉलिम्पिक स्पर्धेतील भारताच्या शानदार कामगिरीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशातील क्रीडा क्षेत्राला यापुढे अधिक प्राधान्य देण्याचे अभिवचन दिले आहे.