वृत्तसंस्था/ कोलकता
पश्चिम बंगालमधील भाजपचे नेते मनीष शुक्ला यांच्या हत्येची चौकशी सीबीआयकडे सोपविण्यात यावी, या मागणीसाठी राज्य भाजप शाखेने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात हल्लाबोल आंदोलन पुकारले आहे. राज्याच्या चोवीस परगाणा जिल्ह्य़ात या आंदोलनाचा प्रारंभ शुक्रवारी करण्यात आला. शुक्ला यांची तिटागड येथे 4 ऑक्टोबरला हत्या करण्यात आली होती. तृणमूल काँगेस कार्यकर्त्यांनी ही हत्या केल्याचा आरोप भाजपने केला असून ममता बॅनर्जी मारेकऱयांना संरक्षण देत आहेत, अशीही टीका भाजपने केली आहे. आंदोलनात अनेक राज्यस्तरीय नेत्यांनी सहभाग घेतला होता.
पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर जीवघेणे हल्ले होण्याचे प्रमाण गेल्या एक वर्षात वाढले आहे. त्यामुळे भाजपने ममता बॅनर्जी यांच्या विरोधात आंदोलन छेडले आहे.