अर्धवट रस्त्याचे कामही पूर्ण करण्याची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
शहापूर व वडगाव परिसरातील विविध रस्त्यांचा विकास स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात येत आहे. बॅ. नाथ पै चौक ते शहापूर पोलीस स्थानकापर्यंतच्या रस्त्याच्या विकासाकडे कानाडोळा करण्यात आला आहे. मात्र शुक्रवारपासून येथील रस्त्याशेजारी गटारीकरिता पाईप घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्याचे अर्धवट काम पूर्ण होणार का? अशी विचारणा नागरिक करीत आहेत.
शहापूर पोलीस स्थानकापासून येळ्ळूर क्रॉसपर्यंत तसेच आरपीडी क्रॉसपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. पण शहापूर पोलीस स्थानकापासून बॅ. नाथ पै चौकपर्यंतच्या 200 मीटर अंतराच्या रस्त्याचा विकास करण्याकडे स्मार्ट सिटी कंपनीचे दुर्लक्ष झाले आहे. यापूर्वीदेखील या रस्त्याचे रुंदीकरण महापालिकेने केले होते. पण शहापूर पोलीस स्थानक ते बॅ. नाथ पै चौकपर्यंत अतिक्रमण असल्याचे सांगून रस्त्याचे डांबरीकरण करण्याकडे कानाडोळा केला होता. त्यामुळे हा रस्ता पूर्णत: खराब झाला आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहापूर पोलीस स्टेशन पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले, पण पुढील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याकडे कानाडोळा केला आहे. त्यामुळे या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याकडे दुर्लक्ष करण्यामागचा उद्देश काय? अशी विचारणा नागरिक करीत आहेत.
महापालिका प्रशासनासह स्मार्ट सिटी कंपनीनेही दुर्लक्ष केले होते. मात्र शुक्रवारी शहापूर पोलीस स्थानक ते बॅ. नाथ पै चौकदरम्यान रस्त्याशेजारी गटारीकरिता पाईप घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जुन्या गटारीच्या ठिकाणी खोदाई करून पाईप घालण्यात आली आहे. त्यामुळे अर्धवट राहिलेले रस्त्याचे काम पूर्ण होणार का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. याबाबत स्मार्ट सिटीच्या अधिकाऱयांकडे चौकशी केली असता गटारीचे पाणी जाण्यासाठी पाईप घालण्यात येत असल्याची माहिती दिली. रस्ता करण्यात येणार की नाही याबाबत कोणतीच माहिती देण्यात आली नाही.
येथील चौकात मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून, वाहनधारकांना ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. शहराच्या दक्षिण भागातील विविध गावांना जोडणारा हा रस्ता असल्याने वाहनांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात आहे. पण अरुंद बनलेल्या खड्डेमय रस्त्यावरून मार्ग काढताना अपघाताचा सामना करावा लागत आहे. रस्ता खराब झाल्याने डांबर पूर्णत: वाहून गेला आहे. केवळ खडी व दगड शिल्लक असल्याने अवजड वाहनांमुळे धूळ उडत आहे. त्याचबरोबर दुकानांमध्ये दगडही उडत आहेत. त्यामुळे नुकसान होत आहे. या रस्त्याची डागडुजी करावी किंवा कॉंक्रिटीकरण करण्यात यावे, अशी मागणी सातत्याने होत आहे. सुरू करण्यात आलेल्या अन्य कामाबरोबर येथील रस्त्याचा विकास तातडीने करण्यात यावा व वाहनधारकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे..