समाजाला मागासवर्ग 2 अ मध्ये समाविष्ट करण्याची मागणी
प्रतिनिधी/ बेंगळूर
पंचमसाली समुदायाला मागासवर्ग 2 अ मध्ये समाविष्ट करावे, अशी मागणी करून रविवारी समुदायाने बेंगळुरात एल्गार केला. लिंगायत पंचमसाली समुदायाचे जयमृत्यूंजय स्वामीजी आणि वचनानंद स्वामीजींच्या नेतृत्त्वाखाली येथील राजवाडा मैदानावर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. समुदायाला मागासवर्ग 2 अ मध्ये समाविष्ट करेपर्यंत आंदोलन सुरूच राहील. मागणी पूर्ण होईपर्यंत बेंगळूर सोडणार नसल्याचा इशारा सरकारला देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील विविध जिल्हय़ातून लाखो नागरिकांनी या मेळाव्यात सहभागी होऊन शक्तिप्रदर्शन केले. परिणामी परिसरात मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. तसेच पंचमसाली स्वामीजींना पाठिंबा दर्शविला.
लिंगायत पंचमसाली समुदायाला मागासवर्ग 2 अ मध्ये समाविष्ट करावे, अशी मागणी करीत कुडलसंगमच्या पंचमसाली पीठाचे जगद्गुरु जयमृत्यूंजय स्वामीजी आणि हरिहर पंचमसाली पीठाच्या वचनानंद स्वामीजींच्या नेतृत्त्वाखाली 14 जानेवारीपासून सुरू झालेली पदयात्रा शनिवारी बेंगळुरात पोहोचली. पदयात्रेच्या अंतिम टप्प्यात रविवारी बेंगळुरातील राजवाडा मैदानात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात 10 लाखापेक्षा अधिक पंचमसाली समुदायाचे नागरिक सहभागी होऊन आपण एकत्रित असल्याचे दाखवून दिले.
पंचमसाली समुदाय आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकरित्या मागास आहे. त्यामुळे समुदायाला मागासवर्ग 2 अ मध्ये समाविष्ट करत समुदायाला न्याय मिळवून देण्याची मागणी सरकारने तात्काळ पूर्ण करावी, यासाठी राज्य सरकारवर दबाव टाकण्याचा निर्णय मेळाव्यादरम्यान घेण्यात आला.
अन्यथा सत्याग्रह करणार…
मेळाव्यात बोलताना जयमृत्यूंजय स्वामीजी यांनी, मेळावा संपण्यापूर्वी सरकारने योग्य निर्णय घ्यावा. अन्यथा विधानसौधसमोर आंदोलन सुरू करण्यात येईल. याकडेही दुर्लक्ष केल्यास उपवास सत्याग्रह सुरू केले जाईल, असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला.
मंत्री मुरुगेश निराणी, सी. सी. पाटील, आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ, शंकरमुनेनकोप्प, अरविंद बेल्लद, लक्ष्मी हेब्बाळकर, माजी आमदार विजयानंद काशप्पनवर यांच्यासह पक्षभेद विसरून राज्यातील सर्वच नेते या मेळाव्यात सहभागी झाले होते. मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्त्वाखाली राजवाडा मैदान परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
फ्रिडम पार्कमध्ये धरणे आंदोलन
मेळाव्यानंतर स्वामीजींच्या नेतृत्त्वाखाली राजकीय नेत्यांनी आपली पदयात्रा विधानसौधकडे वळविली. दरम्यान, गृहमंत्री बसवराज बोम्माई, सी. सी. पाटील, मुरुगेश निराणी यांनी आंदोलकांचे मनपरिवर्तन केल्यानंतर विधानसौध ऐवजी फ्रिडम पार्कमध्ये धरणे आंदोलन छेडण्याचा निर्णय स्वामीजींनी घेतला.
समाजाला मुख्यमंत्री न्याय मिळवून देतील- निराणी
पंचमसाली समाजाला मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा न्याय मिळवून देतील, असा विश्वास मंत्री मुरुगेश निराणी यांनी व्यक्त केला. बेंगळुरातील समाजाच्या मेळाव्यात सहभागी होऊन ते बोलत हेते. आमचे नेते येडियुराप्पा यांनी समाजाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. ते दिलेला शब्द पाळतात, असेही ते म्हणाले.